Saturday, December 6, 2014

Chess is for mind fitness for

बुद्धिबळ मनाच्या तंदुरुस्तीसाठी
शरीराच्या फिटनेसबरोबर मनाची तंदुरुस्ती महत्त्वाची! कारण आपल्याला माहिती आहे की, शारीरिक आजारांमुळे मनावर गंभीर परिणाम होतात तर पुष्कळ वेळा मन:स्वास्थ्य बिघडल्याने त्याने शारीरिक आजार होतात. तेव्हा या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं तर मनाला विचारांची योग्य दिशा देणं महत्त्वाचं! एकदा विचार योग्य प्रकारे विवेकबुद्धीनं करता येऊ लागला की मनाविरुद्धच्या कोणत्याही स्थितीत आपण अतिरेकी विचार करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पर्याय शोधतो. सध्या आपण आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी किती पर्यायांचा विचार करतो? जास्तीत जास्त ४-५ किंवा ७-८ याच्यावर आपण पर्यायांचा विचार करतच नाही. पण आपण नियमितपणे बुद्धिबळाचा खेळ खेळला तर आपण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किमान ५० हून अधिक पर्यायांचा नक्कीच विचार करू. बुद्धिबळ हा खेळ ५ वर्षांच्या बालकापासून ८५ वर्षांच्या वृद्धापर्यंत कुणीही खेळू शकतो. दिवसातून एकदा तरी हा खेळ जरूर खेळावाच. प्रत्यक्ष जोडीदार स्पर्धक घरातल्यापैकी कुणाला तरी घ्यावं किंवा मोबाइल अॅप्स, इंटनेटवर प्रतिस्पध्र्याशी खेळावं. फक्त संगणकाबरोबर खेळू नये. त्या खेळाचा फायदा-अनेक पर्यायांचा त्यातील फायद्या तोटय़ांचा विचार करून ठरावीक कालावधीत अचूक निर्णय घेणं हे या खेळातून आपल्याला साधतं हे महत्त्वाचं! बुद्धिबळ खेळामध्ये प्रत्येक खेळी खेळताना (मूव्ह) ती किती प्रकारांनी करता येते? या विषयी माहिती देताना अहमदनगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये गणित विभागात कार्यरत असलेल्या डॉ. श्रद्धा इंगळे म्हणाल्या, 'गणिती शास्त्रानुसार शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यास असं दिसून येतं की, या खेळात एका चालीनंतर ४०० वेगवेगळ्या प्रकारच्या चालींचे पर्याय उपलब्ध असतात. तर दोन्ही खेळाडूंनी २ चाली खेळल्यावर ७२,०८४ इतके चालीचे प्रकार उपलब्ध असतात.' म्हणजे पाहा नियमित बुद्धिबळ खेळलं तर वैचारिक क्षमता किती प्रचंड प्रमाणात वाढेल आणि मग कौटुंबिक, करिअर, वैयक्तिक जीवनात कोणतीही गुंतागुंतीची समस्या आली तर मग बुद्धीला, नियमित खेळल्याने सवय झाल्याने समस्याग्रस्त वेळी भावनात्मक विचार न करता त्यावर लॉजिकली विचार करू. आपल्याकडे असलेल्या गोष्टीतून समस्येवर मात करण्यासाठी १००-२०० पर्यायांचा विचार करू शकू. एवढं जर झालं तर समस्येचा आपल्यावर पडणारा ताण निश्चितच कमी होईल. असा ताण कमी होतो, असा खेळाडूंचा प्रत्यक्ष अनुभव आहे. ताणाच्या प्रसंगात बुद्धिबळाचे एक मिनीट, तीन मिनीट असे छोटे डाव खेळल्याने ताणातून मुक्तता होते का? याविषयी स्वानुभव व इतर सहकाऱ्यांचे प्रत्यक्षानुभव यांच्या आधारावर, मुंबईतील एकमेव ग्रॅण्डमास्टर, अर्जुन पुरस्कार विजेते प्रसिद्ध बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे म्हणाले, ''मोठय़ा स्पर्धा खेळताना एखादा गेम हरल्यावर दुसऱ्या दिवशीच्या गेमसाठी तयारी करताना हरल्याचे विचार, ताण जाण्यासाठी स्पर्धा झाल्यावर आम्ही एक-एक मिनिटांचे ७-८ गेम्स खेळतो. त्याने लगेच फ्रेश व्हायला होतं. बुद्धिबळ खेळताना इतकी तल्लीनता येते की समजा डोळे दुखत असतील आणि मी बुद्धिबळ खेळायला घेतलं तर काही मूव्हज् झाल्यावर डोळेदुखीची वेदनाच मला जाणवत नाही. अनेक ज्येष्ठ खेळाडूंचाही असाच अनुभव आहे. पूर्वी अनेक खेळाडू असे होते की ज्यांना वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक अडचणी होत्या. पण बुद्धिबळ खेळायला लागले आणि चार-पाच मस्त मूव्हज् केल्या की त्यांना जो आनंद व्हायचा तो बघितला की वाटायचं खरंच त्याच्या आयुष्यात यांना इतक्या समस्या आहेत का? प्रवीण ठिपसे यांच्या पत्नी भाग्यश्री ठिपसे याही महिलांमधील इंटरनॅशनल मास्टर आहेत. प्रवीण ठिपसे म्हणाले, आम्हाला कंटाळा आला, व्यावसायिक ताण असेल तर आम्ही मस्त बुद्धिबळाचे छोटे गेम्स खेळतो आणि एकदम फ्रेश होतो. असा आपल्यामध्ये उत्साह निर्माण करणारा, संयमी वृत्तीनं समस्येवर विविध पर्याय शोधायला शिकवणारा, मनाला आनंद देणारा हा बुद्धिबळाचा खेळ प्रत्येकाने खेळायलाच हवा. खूप वेळ नसेल तर घडय़ाळ लावून अध्र्या तासाचा छोटा खेळ खेळा आणि दिवसभराच्या ताणातून मुक्त व्हा.
 थोडक्यात, तुम्ही तंदुरुस्त राहणं हे तुमच्या हातात आहे, तुम्ही आणि तुम्हीच त्यासाठी वेळ काढायला हवा. खेळ तुम्हाला आनंद देतील. व्याधींमधून, तणावातून मुक्ती देतील. मुख्य म्हणजे तुमचं बालपण परतून येईल. तेव्हा खेळ खेळा, आनंदी जगा.

No comments:

Post a Comment