Tuesday, October 4, 2016

Sambhaji Maharaj Death History in Marathi

संभाजी महाराज मृत्यू  Sambhaji Maharaj death history in marathi language

shambhuraje

sambhajimaharaj

Original Photo of Sambhaji Maharaj


त्या दिवशी असाच बोलता बोलता शिवाजी महाराजांचा विषय निघाला आणि कुणीतरी म्हणाले  कि, 'शिवाजी ने जितके केले, ते सगळे संभाजीने फुकट घालवले.' आजहि भरपूर जणांना इतकीच माहिती आहे की, संभाजी महाराज म्हणजे विलासी आणि गाण्या बजावण्यात मश्गुल राहणारे होते. आणि त्यांना जेव्हा औरंगजेबाने पकडले तेव्हा त्यांचा अमानुष छळ केला.
sambhaji maharaj biography




पण कुणी हा विचार करतो का की, ज्याशिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले, तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय? असे काय घडले होते, कीऔरंगजेब इतका दुखावला होता? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली, (ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे बोटवाकडे करू शकला नाही, मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की, त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता?

काही गोष्टी आपण विसरतो त्या म्हणजे महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या देखरेखीखाली गेले तर संभाजी महाराजांची आई, सईबाई ह्या संभाजीच्या लहानपणीच वारल्या होत्या. जिजाऊ होत्या तो काळ संभाजी महाराजांच्या आयुष्यातला चांगला कालावधी आहे. पण तरी शिवाजी महाराजांना जेव्हढा जिजाऊंचा सहवास लाभला तेव्हढा संभाजी महाराजांना लाभला नाही. शिवाय वेळप्रसंगी आई जेवढी कठोर होवू शकते तेवढी आजी होत नाही,  हे उदाहरण आपण आपल्या घरात देखील बघू  शकतो.

शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते, त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यातदेखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजीमहाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा, तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि, 'इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार?' तेव्हा शंभूराजेम्हणालेकी, 'हत्ती तर आम्ही कसाही घेऊन जाऊ, पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत.' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजीमहाराजांनी वेळोवेळी औरंजेबाला सुद्धा लगावलेले आहेत.

औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबाविरुद्ध बंड केलेतेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते, जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते, 'तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं. तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं. त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता. तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवलाआहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत. हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माचीआहे.  त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत. जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावरआले ती आता साध्य झाली आहे. त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं. एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत. पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत. त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी.' [संदर्भ:शहेनशहा, ना.स.इनामदार]

युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही.घरातील बेबनावांमुळे शिवाजीमहाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता, श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. श्रीरंगपुरसंभाजी महाराजांची सासुरवाडी होती. कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते पण शिवाजी महाराज पन्हाळा, सातारा, महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले. सगळ्या प्रजेसमोर संभाजी महाराजांचा केव्हढा मोठा अपमान झाला असेल? मानसिंगाच्या पाठीमागे उभं केल्यावर ज्या राजाला अपमानित वाटलं आणि भर दरबारात महाराजांचा आवाज चढला. बापाचा स्वाभिमान जवळून पाहिलेल्या त्यांच्या मुलाने असा अपमान  झाल्यावर बंड केले नसते तरच नवल.

मराठे शाहीचे दुर्दैव हे कि संभाजीमहाराज (वय वर्ष ३२), विश्वासराव पेशवा(वय वर्ष १६) माधवराव पेशवा (वय वर्ष २७) हे मराठ्यांचे पराक्रमी राजकुमार फारच अल्पायुषी होते. वयाच्या ३२व्या वर्षी औरंगजेबासमोर गुडघे न टेकता मातृभूमीसाठी मरणाला बहाद्दुरीने मिठी मारणार्‍या राजाबद्दल जेव्हा सकाळच्या ८:२०ची लोकल पकडण्याची काळजी करणारा आम आदमी, ''शिवाजीने जितके केले, ते सगळे......'' बोलून अक्कल पाजळतो तेव्हा चीड येते.

======
शंभुराजांचे चरित्र मराठी माणसासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या पाठीशी जन्मत:च संघर्ष लागलेला होता. जन्मल्याबरोबर आईच्या दुधासाठी संघर्ष करावा लागला. दोन वर्षाचे झाल्यावर मातेचे छत्र हरवले. वयाच्या आठव्या वर्षी शंभुराजांना दिलेरखानाकडे ओलीस रहावे लागले होते. नाशिकमधला रामशेज किल्ला साडेपाच वर्षे संभाजी राजांनी लढवला, पण औरंगजेबाला मिळू दिला नाही. औरंगजेबाला जिवंतच तुरुंगात डांबतो, अशी इच्छा मनाशी बाळगणारे संभाजी खरोखर लढवय्ये होते.
==========

आठवतील का ती साडेतीनशे वर्ष? हो! तीच वर्ष ज्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र 'गुलाम' झाला होता. बादशहाची चाकरी करण्यात सर्वांना धन्यता वाटत होती. पण तिकडे मंदिरे फुटत होती. रयत लुबाडली जात होती. मग ज्योत दिसली! मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे आणि लखुजी जाधव यांची कन्या जिजाऊ यांचा पुत्र जन्माला आला. शिवाई देवीच्या आशिर्वादाने, शिवनेरी गडावर जन्माला आलेले हेच ते, शिवाजी महाराज!

आईसाहेबांनी लहानपणापासून शिवबाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. त्यावेळी महाराष्ट्रात एका सुईच्या टोकाएवढी जागासुद्धा स्वतंत्र नव्हती, चारी दिशांना 'पातशाह्या' होत्या आणि या मधून स्व-राज्य उभारायला हा वीर, शूर मराठा चालला होता. मग काय, हातभर मावळे जमले, तलावरी काढल्या, घोड्याला घोडी भिडली आणि तोरणगड स्वतंत्र झाला. आणि मग असे करता करता जावळी, पुरंदर, अफझल वध, सिद्धीचा वेढा, दोनदा सुरतेची लूट, शाइस्तेखानाची फजिती, कर्नाटकची स्वारी!

महाराजांच्या अशा एकाहून एक रोमांचक गोष्टी आहेत. या संपूर्ण वाटचालीत महाराजांना आशिर्वाद होते ते जिजाऊ, शहाजी आणि आई भवानीचे. त्याच प्रमाणे राजांना अनेकांचे सहकार्य लाभले. बाजी पासलकर, कान्हाजी जेधे, येसाची कंक, नूर बेक, सिद्धी हिलाल, नेताजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, बाजीप्रभू, मुरारबाजी, मोरोपंत, पेशवे, हंबीरराव मोहिते, हिरोजी फज्द, कोंडाजी फर्जंद आणखी किती नावे सांगू? याची यादी कधी न संपणारी आहे, असंख्य आहे. अखेर ६ एप्रिल १६८० ला सूर्य मावळला! राजांचा मृत्यू झाला. राजे देवलोकी गेले.

राजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा कारभार सांभाळला त्यांच्या छाव्याने- संभाजी राजाने! पण नंतर घात झाला. दगाबाजी झाली. महाराजांचे मेहुणे गणोजी शिकेर् या गद्दाराने एकदम राजांवर हल्ला करून त्यांना कैद करण्यास मदत केली. एक निडर मराठा वाघ कैद झाला.

'मराठ्यांच्या छत्रपतीला कैद झाली तरी त्याचे स्वराज्य सुरळीत आणि बळकट कसे?' असा प्रश्न औरंगजेबाला सतावू लागला. 'तू मुसलमान हो, तुला मोठी जहांगीर मिळेल.' असा आवाज तो रोज राजांना त्या काळकोठडीत द्यायचा. पण धर्म बदलणे कदापी शक्य नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अखेर भिमानदीच्या काठी दोन्ही वाघांची - शंभूराजे आणि कविराज भूषण यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. मराठ्यांच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अंत झाला. औरंगजेब मात्र शिवाला पकडू शकला नाही आणि त्याच्या छावण्यावर देखील आपली मजीर् चालवू शकला नाही. शिव-शंभू राजे आता नाहीत, पण त्यांचे विचार, ताकद, संस्कृती, आशीर्वाद आम्हा मराठ्यांना लाभले आहेत.
============

original pic of aurangzeb
original pic of aurangzeb


औरंगजेब हा कट्टर हिंदुद्वेष्टा आणि मूर्तिभंजक म्हणून इतिहासात प्रसिद्ध असला, तरी गुजरातमधील सोमेश्वर महादेव मंदिराला त्याने मोठी देणगी आणि जमीन इनाम दिल्याची बाबही नुकतीच अहमदाबादयेथील इतिहाससंशोधक प्रदीप केशरवानी यांनी उघडकीस आणली आहे. त्यानिमित्ताने एकूणच मुस्लिम शासकांच्या परधर्माबद्दलच्या दृष्टिकोनाचा घेतलेला वेध...

भारताचा मध्ययुगीन इतिहास अनेक संगती, विसंगतींनी भरलेला आहे. शिवाय त्यास धर्मवादाची केशरी, हिरव्या रंगाची झालर असल्यामुळे तो समज, गैरसमजांनीही व्यापलेला आहे. त्यामुळे त्याचा नेमका अन्वयार्थ लावणेही तितकेच कठीण होऊन बसले आहे. तरीही वर्तमान समजून घेण्यासाठी व भविष्यकाळाची दिशा ठरविण्यासाठी भूतकाळात घडलेल्या घटनांमागील कार्यकारणभाव समजून घेणे आवश्यक असते. किंबहुना इतिहासाच्या अभ्यासाचे तेच प्रमुख उद्दिष्ट असते.

अशा ऐतिहासिक घटना अनेकदा गतिशील असतात, तर कधी कधी त्यांचा प्रवाह संथही असतो. बाबराने उण्यापुऱ्या चार वर्षांत मोगल साम्राजाचा पाया तर घातलाच, पण त्या काळात त्याने स्थापन केलेले साम्राज्यही आकाराने बरेच मोठे होते. याचाच अर्थ असा की त्या चार वर्षांच्या काळात पायाला भिंगरी लावूनच त्याला वणवण करावी लागली होती. त्याने कधीही पवित्र रमझान महिन्यात एका ठिकाणी एकाहून अधिक दिवस वास्तव्य केलेले नाही, असे इतिहासात नमूद आहे. त्याच्या निधनानंतर गादीवर बसलेल्या हुमायुनची कारकीर्दही धावपळीनेच भरलेली आहे. सत्तेवर आल्याआल्याच शेरशहाने त्याचा पराभव करून त्याला देशोधडीला लावले. त्याचे नशीब बलवत्तर म्हणूनच त्याने शेरशहाचा पराभव करून आपले राज्य पुन्हा जिंकले.


हुमायन नंतर त्याचा पुत्र सम्राट अकबर वयाच्या सोळाव्या वर्षी गादीवर बसला. आपले वडील व आजोबा यांच्या तुलनेत त्याची कारकीर्द बरीच शांतीपूर्ण होती, असे म्हणता येईल. अर्थात साम्राज्यवाढीसाठी त्याने युद्धे लढाया केल्याच. तरीपण एकूणात त्याची कारकीर्द शांतीपूर्ण होती, असे म्हणता येईल.

इतिहास घडविणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावाचा, त्यांच्या आवडीनिवडी, वांशिक वा धार्मिक संस्कार आणि त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन यांचाही प्रभाव त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यावर पडत असतो. हा प्रभावसुद्धा व्यक्तिगणिक वेगळा असू शकतो. समाजकल्याण, हे जर ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनकार्याची प्रेरणा असेल तर त्यांची नावे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात. इतर मात्र इतिहासात कायमचे बदनाम होऊन राहतात. या संदर्भात कालानुक्रमाने सम्राट अकबर आणि छत्रपती शि‍वाजी महाराज यांचा उल्लेख करावा लागेल. सम्राट अकबर आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांनी समाजाला नवे विचार, नवी मूल्ये व नवी दिशा दिली, म्हणून त्यांची नावे इतिहासात अजरामर झाली.

बाबरापासून सुरू झालेल्या या राजकीय स्थित्यंतराचे आणखी एक वैशिष्ट्य होते. उझबेकिस्तानातील फरगणा हे बाबराचे मूळ गाव. तेथून तो साम्राज्य लालसेने किंवा इतर कुठल्या कारणामुळे भारतात आला. म्हणजे तो परकीयच. त्यामुळे मरताना त्याला फरगण्याच्या दिवसांची आठवण येणे साहजिक होते. ते एक प्रकारचे स्मरणरंजन होते. पण त्याच्या नंतर सत्ताधारी झालेल्या हुमायुनपासून त्यांच्या भारतीयकरणाची प्रक्रिया सुरू झाली व बहादुरशहा जफरने त्याचा कळसाध्याय लिहिला. या सम्राटांपैकी कुणालाही आपल्या मातृभूमीत जावेसे वाटले नाही. या मातीत विलीन होणे हे त्यांचे प्राक्तन होते व तीच त्यांची अंतिम इच्छा होती. शेवटचा मोगल बादशहा बहादुरशाह जफर यानेही हीच इच्छा शेवटच्या क्षणी व्यक्त केली होती. वास्तविक बहादुरशहा हा काही त्याच्या पूर्वजांसारखा कर्तृत्ववान राज्यकर्ता नव्हता. उलट कर्तृत्वहीन, शोकांत शेवट झालेला मोगलसम्राट, असेच त्याचे वर्णन करावे लागेल. तरीही १८५७च्या स्वातंत्र्यसमरात, सहभागी झालेल्या सर्व भारतीय राजांनी त्याला स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक मानून त्याच्या नेतृत्वाखाली बंड केले. ते बंड अयशस्वी झाले व बहादुरशहा जफरला अटक करून ब्रिटिशांनी रंगून येथे कैदेत ठेवले. मरणसमयी त्याची व्यथा राज्य गेल्याची नव्हती किंवा गेलेले राज्य पुन्हा मिळविण्याची ईर्षाही त्याला नव्हती. मृत्यू पावल्यानंतर आपल्या मातृभूमीत आपले दफन होणार नाही, ही त्याची खंत होती व वेदनाही होती. ती त्याने शब्दात अशी व्यक्त केली आहे - 'कितना बदनसीब जफर के दफ्न के लिये दो गज जमींभी न मिली कुए यार मे'.

सम्राट अकबराच्या निधनानंतर राजपुत्र सलीम हा जहाँगीर म्हणून तख्तनशीन झाला. सत्ता हाती येताच, आपण आपल्या वडिलांचेच उदार व सर्वसमावेशक धोरणच पुढे चालवू असे त्याने जाहीर केले. दुर्दैवाने त्यावेळी दरबारी राजकारणातील अंतःप्रवाहाची त्याला जाणीव झाली नाही. सम्राट अकबराच्या उदारमतवादी ‌आणि सर्वसमावेशक धोरणाला तत्कालीन सनातनी धर्मपंडिताचा कठोर विरोध होता. पण अकबराची लष्करी शक्ती, जबरदस्त इच्छाशक्ती आणि आपल्या नव्या धोरणाला त्याने दिलेली समर्थ विचारांची बैठक यामुळे सनातन्यांच्या राजकीय-सामाजिक विरोधाची धार कधीच तीव्र होऊ शकली नव्हती. पण ती पूर्ण शमली नव्हती. म्हणूनच अकबराच्या निधनानंतर ती पुन्हा उफाळून वर आली. म्हणूनच जहाँगीरवर प्रभाव टाकण्यास सनातनी उलेमांनी सुरुवात केली. या प्रयत्नात अहमद सरोहंदी अग्रभागी होता. काही प्रमाणात या सनातन्यांना यश मिळाले. कारण जहाँगीरने नवधर्मांतरितांना रोज द्रव्यदान करण्यास सुरुवात केली. परंतु काही दिवसातच त्याच्या लक्षात आले की मुस्लिम तरुणांबरोबर विवाह केलेल्या काही नवधर्मांतरित तरुणींना परत मूळ धर्मात घेतले जाते. हे त्याला कळल्यानंतर त्याने हा प्रकार कायमचा बंद केला व दोषींना शिक्षाही केली. या त्याच्या धोरणामागे धार्मिक कट्टरतेपेक्षा इस्लामी कायद्याच्या अंमलबजावणीचा भाग अधिक होता, असे इतिहासकार मुझुमदारांचे म्हणणे आहे. कारण शरीयतच्या कायद्याप्रमाणे मुस्लिम स्त्री बिगर मुसलमानांशी लग्न करू शकत नाही. जहांगीर या कायद्याची अंमलबजावणी करत होता, एवढेच. पण त्याचबरोबर जबरदस्तीने होणारे धर्मांतर बेकायदा ठरवून त्यावरही बंदी घातली. औरंगजेबाने आपल्या पूर्वजांनी मिळविलेले आणि स्थिर व समृद्ध केलेले साम्राज्य उध्वस्त करण्याचा जणू विडाच उचललेला होता. कारण त्याच्या धर्मवेड्या आणि असहिष्णु धोरणामुळे मोगल साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. बाबरापासून शहाजहानपर्यंत मोगल सम्राटांनी एक गोष्ट जाणली होती. साम्राजाचा विस्तार लष्करी सामर्थ्यावर करता येतो. पण त्याला स्थैर्य देता येत नाही. त्यासाठी राष्ट्रीयत्वाची भावना व लोककल्याणकारी धोरण याची गरज असते. औरंगजेबाने नेमक्या याच गोष्टींकडे दुर्लक्ष केले. परिणामतः त्याच्या वैभवशाली साम्राजाची वाटचाल विनाशाच्या दिशेने सुरू झाली. ती त्याच्या नंतर कुणालाच थांबविता आली नाही.

परंतु औरंगजेबाच्या व्यक्तिमत्त्वात अनेक विसंगती असलेल्या आढळतात. संभाजी महाराजांना त्याने हालहाल करून मारले हे जितके खरे आहे, तितकेच संभाजीपत्नी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना त्याने २७ वर्षे नजरकैदेत, पण सुखरूप ठेवले होते. तेही स्वतःच्या राजवाड्यात व तिथे त्याची कन्या झेबुन्नीसा हीच त्या दोघांची काळजी घेत होती. या काळात त्याने येसूबाई आणि शाहू यांना कसलाही त्रास दिला नाही वा त्यांना धर्मांतरितही केले नाही. उलट लग्नाचे वय होताच, त्याने मातब्बर मराठा घराण्यातील मुलींशी शाहूचे ल्गव लावले.

तो धार्मिक होता तसाच धर्मवेडाही होता. म्हणूनच त्याने अनेक मंदिराचा नाश केला. पण त्याचबरोबर सोमेश्वरसारख्या इतर अनेक म‌ंदिरांना सनदा दिल्याचेही इतिहासात नमूद आहे. इथे औरंगजेबाच्या धर्मवेडाचे समर्थन करण्याचा हेतू नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विसंगती दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. अशीच आणखी एक विसंगती म्हणजे औरंगजेबाचे धर्मवेड सर्वश्रुत आहे, पण त्याचबरोबर तो संगीतद्वेष्टाही होता. असे करण्याने आपण इस्लामच्या आदेशाचे पालन करत आहोत, असा त्याचा दावा होता. विरोधाभास असा की त्याच्याच कारकिर्दीत मिर्झा रोशन दामीर याने भारतीय संगीत व नृत्य या विषयावरील 'पारिजातक' या ग्रंथाचे 'तर्जुमा-अल-पारिजातक' या नावाने पर्शियन भाषेत अनुवाद केला आहे व तो उपलब्धही आहे. या मिर्झा रोशन दामीर याला औरंगजेबाने शिक्षा मात्र केली नाही.

भारताच्या मध्ययुगीन इतिहासात अनेक मुस्लिम शासकांची अशी उदाहरणं आढळतात, मग तो विजापूरचा आदिलशहा असेल किंवा गोवळकोंड्याचा कुतुबशहा. या सगळ्यांचा धर्म मुस्लिम असला, तरी त्यांनी हिंदूंवर सरसकट अन्याय केला नाही. कारण शेवटी ती त्यांची जनताच होती. आदिलशहाने पंढरपूरच्या विठ्ठलमंदिराला दान दिल्याचा पुरावा उपलब्ध आहे. तसंच त्याने मोरगावच्या गणपतीला वतन दिल्याचीही माहिती सापडते. त्याने केलेल्या या मदतीचं प्रतीक म्हणून मंदिराच्या आवारात त्याचा दगडी मुखवटाही स्थापित करण्यात आला आहे.

मुस्लिम शासकांनी हिंदू धर्महिताचे निर्णय घेतल्याचे असे अनेक दाखले इतिहासात सापडतील. अर्थात काळाच्या कसोटीवर टिकण्यासाठी अकबर आणि शिवाजीमहाराजांसारखं जनहिताचं राज्य चालवणंच कधीही श्रेयस्कर ठरतं!
===========
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर पन्हाळागडाला उपराजधानीचा दर्जा दिला. तसेच महाराणी ताराराणींनीही आपल्या राज्यकारभाराला पन्हाळ्यावरून सुरूवात केली. अनेक पराक्रमांचा साक्षीदार असलेला पन्हाळा आता पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. मात्र हाच पन्हाळा आज विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. त्याचा वेध घेणारी मालिका आजपासून...

स्वत:चे अस्तित्व टिकवत, नैसर्गिक बाज राखत, अनेक राजवटींची साक्ष देत ठामपणे उभा असलेला, अनेक शिवकालीन पिढ्यांच्या इतिहासाची जाणीव करून देणारा, वीरांमया र्शार्यगाथांची कथा सांगणाऱ्या पन्हाळगडाचे आजही सौदर्य पर्यटक व इतिहासप्रेमींना भुरळ घालत आहे. इंग्रजी राजवटीत ऐतिहासिक चार दरवाजा पाडून गडावर यायला इंग्रजांनी वाट केली आणि गडावर वाहने येऊ लागल्या. हिलस्टेशन म्हणून स्थापन झालेल्या नगरपरिषदेने सर्व गडावर रस्ते तयार केल्याने पर्यटकांच्या गाड्या प्रत्येक ऐतिहासिक वास्तूपर्यंत जाऊ लागल्या. इतिहासाची साक्ष देत आजही अनेक वास्तू इथे ताठ मानेने उभ्या आहेत. शिवाजी महाराजांची ज्या मार्गाने गडावर प्रवेश केला तो ऐतिहासिक तीन दरवाजा. याच ठिकाणी शिवाजी राजांवर सुवर्ण फुले उधळली गेली, त्या प्रसंगाची आठवण होताच आजही रोमांच उभे राहतात. गडावर येणारे आणखी दोन दरवाजे म्हणजे पूर्वेकडील चार दरवाजा आणि उत्तरेकडील वाघ दरवाजा. या गडावर येणाऱ्या तीन दरवाजांपैकी दोन दरवाजे आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. याच पन्हाळगडावरून सिद्धी जौहर व फाजलखानाच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांनी ‌शिताफीने सुटका करून घेतली होती. तेथून विशाळगड जवळ करताना पावनखिंडीत रणसंग्राम घडला आणि मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडेंनी प्राण अर्पन केले. असा अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या पन्हाळ्याचा डौल कायम आहे.

गडावर असलेल्या सदर-ई-महाज तथा सज्जाकोठी, नायकिणीचा सज्जा, धर्मकोठी, रेडेमहाल, अंबरखाना या ऐतिहासिक वास्तूंमुळे इतिहासाची पाने उलघडली जातात. अंधारबाव, पराशर ऋषींची गुहा, काली बुरूज, पुसाटी बुरूज, ताराराणींचा राजवाडा, शिवमंदिर, दुतोंडी बुरूज, संभाजी महाराज मंदिर, पंत अमात्य समाधी, सोमेश्वर तलाव, साधोबा तलाव आदी अनेक वास्तू आजही गडावर आपले अस्तित्व टिकवून आहेत. गडावर तसेच गडाच्या सभोवताली भरपूर जंगल असल्याने विविध प्रकारचे पशु-पक्ष्यांचा इथे वावर आहे. पन्हाळ्याच्या पूर्वेला असणाऱ्या पावनगड परिसर तांबड्या, पांढऱ्या शाडूचा असल्याने नैसर्गिक गारव्यामुळे परिसरात थंडावा आहे. या परिसरात मोर, लांडोर, दयाळ, बुलबुल, ब्राह्मणी मैना, कस्तर, जंगली राघू आदी पक्षी भरपूर प्रमाणात असल्याने पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे चांगले ठिकाण आहे.

गडाचे क्षेत्र मर्यादित असल्याने तसेच पुरातत्व खाते नवीन बांधकामास परवानगी देत नसल्याने येथील वस्ती मर्यादित आहे. त्यामुळे गडावर असणारे जंगल आजही टिकून आहे. पन्हाळगडावर नेहमीच थंडगार वातावरण असते. ऐतिहासिक वारसा तसेच निसर्गाच देणं लाभल्याने पन्हाळगड आजही पर्यटकांना खुणावत आहे.

पन्हाळगडाला पन्नगालय, पराशराश्रम, पद्मालय, शहानबी दुर्ग, पन्हाळा अशी विविध नावे.
सातारा येथे सापडलेल्या तांब्याच्या मुद्रेनुसार ११९१-९२ मध्ये शिलाहार भोज राजा दुसरा याची पन्हाळा ही राजधानी होती.
गडाची समुद्रसपाटीपासून उंची ३१२७ फूट, पर्जन्यमान सरासरी १८०० ते २००० मी.मी.
१६५९ साली छत्रपती शिवरायांनी पन्हाळगड स्वराज्यात सामील करून घेतला.
१२ जुलै १६६०रोजी सिद्दी जौहरने घातलेल्या पन्हाळा वेढ्यातून निसटले.
६ मार्च १६७३ ला कोंडाजी फर्जंदने अवघ्या ६० मावळ्यानिशी पन्हाळा पुन्हा सर केला.
शिवरायांचे पन्हाळगडावर एकूण वास्तव्य ७८२ दिवस.
१७०५ मध्ये महाराणी ताराबाई यांनी पन्हाळा ही आपली राजधानी बनवली.
थंड हवेचे ठिकाण असलेन खास बाब म्हणून क वर्ग नगरपालिकेचा दर्जा


=====

एखाद्या पराक्रमाची छाप त्या गावाच्या भावविश्वावर असते. तसेच रामशेज किल्ल्याच्या कवेतील आशेवाडी गाव रामशेजच्या पराक्रमातून निर्माण झाले आहे. रामशेजने पडझडीच्या काळात धैर्य आणि शौर्याची गाथा रचून मराठी साम्राज्याला लढत राहण्याचा एक आशेचा किरण दिला. तर 'मूर्ती लहान मात्र कीर्ती महान' असलेल्या रामशेजने लढाईतील नवनव्या युद्धतंत्रांचीही ओळख करून दिली. फक्त अज्ञात राहिला तो शूरवीर अन्‌ वनवास भोगत असलेला रामशेज किल्ला. पण आजही प्रेरणा देत उभा असलेला रामशेज साद घालतो, तर आशेवाडी लढत राहण्याची आस जागवते.

रमेश पडवळ

नाशिक-पेठ रस्त्यावर पंचवटीपासून १० किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ला आहे. नाशिक-पेठ रस्त्यापासून उजव्या हाताला अर्ध्या किलोमीटरवर किल्ल्याच्या पायथ्याशी आशेवाडी गाव आहे. रामशेज किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणे दऱ्याखोऱ्यांत, जंगलात अथवा खूप उंचीवर नाही. एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर त्याने आपले बलदंड शरीर झोकून दिले आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर एखादा शूरवीर निर्धास्त होऊन पहुडल्याचा भास होतो. श्री राम या किल्ल्यावर विश्रांतीला यायचे म्हणून या डोंगराला रामशेज म्हटले जाते. राम जेथे झोपत ती जागाही पहायला मिळते, अशी आख्यायिका आहे. गावात प्रवेश करताना लहान लहान मातीची घरे स्वागत करतात. एका मोठ्या निंबाच्या झाडाखाली हनुमानाचे दुमजली मंदिर आहे. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर अभ्यास‌िका चालविली जाते. तेथून किल्ल्याकडे जाता येते. रामशेजचे वैशिष्ट्य असे की, तो कोणत्याही बाजूने सहज चढता येतो अन्‌ तोही अगदी तासाभरात. किल्ल्याजवळच राम मंदिर आहे. तेथे राम, सीता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्ती आहेत. येथे पाण्याचे कुंड आणि एक बोगदाही आहे. सीतागुंफेतून रामशेजला जाण्यासाठी बोगदा असल्याचेही म्हटले जाते. मात्र, सध्या तो बंद आहे.

रामशेज किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी राम मंदिरावरील एक शिलालेख आपले स्वागत करतो अन्‌ किल्ल्याच्या पराक्रमाची ओळख करून द्यायला लागतो. या शिलालेखाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना न केल्याने त्याची अवस्था बिकट झाली आहे. मात्र आजही तो इतिहास सांगण्याचे काम नाकारत नाही. शिवकाळानंतर महाराष्ट्रावर मोगलांची आक्रमणे वाढू लागली. मराठा साम्राज्य काबीज करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने आखलेल्या पहिल्या मोहिमेत रामशेज या छोट्याशा किल्ल्याचाही समावेश होता. तो फक्त किल्ला जिंकायचा म्हणून नाही तर औरंगजेबाच्या शहाबुद्दीन खानाने १६६४ मध्ये रामशेज मिळविण्याचे जोरदार प्रयत्न करूनही तो अपयशी ठरल्याने औरंगजेबाने रामशेजवर नजर ठेवली होती. शहाबुद्दीन खानाला रामशेजवर चढाईचा अनुभव असल्याने औरंगजेबाने एप्रिल १६८२ ला किल्ला मिळविण्याचे काम त्याच्याकडेच सोपविले. त्याने दहा हजार सैन्य घेऊन रामशेजला वेढा घातला. रामशेजवर यावेळी अवघ्या सहाशे सैन्यासह किल्लेदार सूर्याजी जेधे होते. (रामशेजचा किल्लेदार नेमका कोण होता याबाबत मतमतांतरे आहेत.) शहाबुद्दीन खानाने हल्ल्यासाठी रामशेजच्या उंचीचा लाकडी बुरूज (धमधमा) तयार केला. महाराष्ट्रातील युद्धतंत्रात हा अजब प्रकार पहिल्यांदा घडला होता. धमधम्यावरून तोफांचा मारा करूनही रामशेज झुकेना. शहाबुद्दीन खानाचे सगळे प्रयत्न फसले. या धमधम्याला उत्तर देण्यासाठी किल्लेदाराने लाकडी तोफा तयार केल्या व चामड्याच्या मदतीने प्रत्युत्तर दिले. त्यावेळी रामशेजवर एकही लोखंडी तोफ नव्हती. लाकडाच्या तोफा हाही युद्धतंत्रातील अजब प्रकार फक्त रामशेजबाबत सापडतो. रामशेजवरून होणाऱ्या दगडांच्या वर्षावामुळे शहाबुद्दीन खानाचे मोगल अधिकारी मारले जात होते. दुसरीकडे छत्रपती संभाजीराजांनी रामशेजच्या मदतीसाठी सैन्य पाठवून किल्ल्याभोवतीचा वेढा तोडण्याचे तंत्र अवलंबले होते. ही कामगिरी त्यांनी रूपाजी भोसले व मानाजी मोरे यांच्याकडे सोपविली होती. त्यांनी औरंगजेबाच्या फौजांच्या नाकात दम आणला होता. यश मिळत नसल्याने १२ मे १६८२ ला औरंगजेबाने आपला सावत्र भाऊ खानजहान बहाद्दूर कोकल्ताश याला शहाबुद्दीन खानाच्या मदतीला पाठवला. दरम्यान, मोगलांना नाशिकमधून येणारी रसद लुटण्याचे काम मराठा सैनिक करीत होते. नाशिक, गणेशगाव परिसरात मोगल फौजा व मराठ्यांच्या लहान-मोठ्या लढाया घडत होत्या. २ वर्षे झाली, इतके करूनही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला. कोकल्ताशने रात्रीची आघाडी उघडली; पण तिही किल्लेदाराने हाणून पाडली. रामशेजवरील मराठ्यांची भूते वश करण्यासाठी मांत्रिकाचाही कोकल्ताशने उपयोग केला. यावेळी मांत्रिकाने शंभर तोळ्याचा नाग बनवून मागत किल्ला सर करून देतो असे सांगितले. मांत्रिक सोन्याच्या नागासह किल्ला चढू लागला. त्याच्या मागे मोगल सैन्य चढाई करू लागले. मध्यावर आल्यावर गोंफणीतून आलेल्या एका दगडाने मांत्रिकाला टिपले अन्‌ हा डावही उधळला गेला. यासाठी नाग बनविण्याचा खर्च ३७ हजार ६०० तीस रुपये इतका आल्याचा उल्लेख मोगल दप्तरात सापडतो. त्यानंतर बहाद्दूर खान, फतेह खान, कासिम खान किरमाणी व उम्वतुल्मुल्क अशा अनेक मोगल सरदारांनी रामशेज मिळविण्यासाठी अयशस्वी चढाया केल्या. मोगलांच्या प्रत्येक हल्ल्याला मराठे तोडीचे उत्तर देत होते. त्रिंबकगडावरील एक लोखंडी तोफ रामशेजच्या मदतीसाठी आणली जात असताना मोगलांनी ती ताब्यात घेतली. १६८४ पर्यंत रामशेज हलला नाही. अखेर रामशेजचा वेढा सुटला. संभाजी महाराजांनी रामशेजच्या किल्लेदाराला चिलखत पोषाख, रत्नजडित कडे आणि नगद देऊन प्रमुख किल्लेदार केले. त्यानंतर रामशेजवर आलेल्या नव्या किल्लेदाराला अब्दुल करीम नावाच्या जमीनदारामार्फत मुल्हेरचा किल्लेदार नेकनाम खान याने वश केले व फितुरीने १६८७ मध्ये रामशेज औरंगजेबाच्या ताब्यात गेला. असे म्हटले जाते की हा किल्ला सहा वर्षे झुंजत होता. मात्र, प्रत्यक्षात १६६४ पासून १६८७ पर्यंत अशी २४ वर्षे मोगलांची आक्रमणे किल्ल्याने झेलली होती. औरंगजेबाच्या अनेक हल्ल्यांविरोधात लढत आणि मराठी साम्राज्यासमोर आदर्श युद्धन‌ीतीचे उदाहरण रामशेजने उभे केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. या झुंजीची दखल इंग्रजांनीही घेतल्याचे त्यांच्या ३० जुलै १६८२ च्या पत्रव्यवहारावरून दिसते. नंतर पेशवाईत दाखल झालेला रामशेज १८१८ मध्ये इंग्रजांनी घेतला. यावेळी इंग्रजांना गडावर सतरा तोफा, जंबुरे, २५१ पौंड दारूगोळा, गंधक, चांदी, पितळ, शिसे, ताग, तांबे, गालीचे व एक चिलखत सापडली. ही चिलखत शिवाजी महाराजांची असल्याचे नाशिकचे तेव्हाचे जिल्हाधिकारी कॅप्टन ब्रिज यांनी २० जून १८१८ च्या रिपोर्टमध्ये लिहून ठेवले आहे.

रामशेज पाहताना लक्षात येते की, किल्ल्याची रचना साधी असली तरी विशिष्ट पाषाणाच्या नैसर्गिक कड्यामुळे शत्रूंना हा किल्ला लढून सर करता आला नाही. विशेष म्हणजे काळाराम मंदिर याच रामशेज किल्ल्याच्या बुरजांच्या दगडापासून बनविण्यात आले आहे. मराठी साम्राज्याला लढत राहण्याची आशा देणाऱ्या या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावाचेही नाव त्यामुळेच आशेवाडी पडले असावे. मात्र, किल्ल्याच्या देखभालीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मराठा साम्राज्यातील सर्वाधिक काळ झालेली झुंज नव्या रूपाने नव्या पिढीसमोर मांडण्याचीही गरज आहे. आशेवाडीत होणारे बोहाडेही मागील तीस वर्षांपासून बंद झाले आहेत.

====

'ज्या शंभुराजांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या स्वराज्याची स्थापना केली त्या धर्म, देश, संस्कृतीचा जाज्ज्वल्य अभिमान असणाऱ्या पराक्रमी आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची खरी बाजू इतिहासकारांनी कधीच लोकांसमोर आणली नाही. राजे संभाजींवर इतिहासकारांनी फार मोठा अन्याय केला', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली.

सुप्रसिद्ध शिवकथाकार, 'शककर्ते शिवराय'चे लेखक विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरुदास महाराज लिखित 'राजा शंभुछत्रपती' पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. राणी लक्ष्मीबाई पटांगणात झालेल्या या कार्यक्रमाला साहित्यिक विश्वास पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विजयराव देशमुखांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वसुधा देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.

विश्वास पाटील म्हणाले, 'संभाजी हा प्रगतिशील राजा होता. पण बाया-बापड्यांमुळे त्यांना बदनाम केले गेले. त्यांच्यावर ८७ नाटके लिहिली गेली. त्यातील बहुतेक सर्व नाटकांमध्ये त्यांची बदनामीच अधिक आहे. पण, शंभुराजे तसे नव्हते. मराठी लेखकांनीच त्यांना बदनाम केले. शंभुराजे स्त्रीजातीला महत्त्व देणारे होते. त्यांचा इतिहास गौरवाचा आहे.' स्वराज डोंगरे या तरुणाने यावेळी शंभुमहाराजांचा पोवाडा सादर केला.
==========
प्रतापगडावरचं तुळजापूरच्या भवानीची प्रतिकृती असलेलं तुळजाभवानीचं मंदिरही खुद्द शिवाजी महाराजांच्या देखरेखीखाली बांधलं गेलं. प्रतापगडावरील तुळजाभवानीच्या मंदिराविषयीची ऐतिहासिक कागदपत्रं तपासून त्याबद्दलची जुनी- नवी माहिती मिळवत या मंदिराच्या इतिहासाचा घेतलेला हा परामर्ष
...........................................


रायगड आणि प्रतापगड हे शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत बांधले गेलेले किल्ले म्हणजे दुर्गस्थापत्याचे उत्कृष्ट नमुने. मराठी माणसाच्या मनात प्रतापगडाचं महत्त्व आगळं. कारण याच किल्ल्यावर अफझलखानाच्या रूपात आलेल्या स्वराज्यावरच्या संकटाचं महाराजांनी निराकरण केलं. या प्रतापगडावरचं तुळजापूरच्या भवानीची प्रतिकृती असलेलं तुळजाभवानीचं मंदिरही खुद्द ​महाराजांच्या देखरेखीखाली बांधलं गेलं. नवरात्र आणि विजयादशमीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शक्तिस्थानांविषयी बोललं जातं. त्यातुलनेने प्रतापगडावरील तुळजाभवानीच्या मंदिराविषयी मराठी माणसाला फारशी माहिती नाही. गेली काही वर्षे या मंदिराविषयीची ऐतिहासिक कागदपत्रे शोधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. कागदपत्रे तपासताना महाराजांनी देवीच्या पूजेअर्चेसाठी दूरवर विचार करून वेगळं संस्थानच तयार केल्याचं दिसतं. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज, राजाराम महाराजांनी त्यात भर घातल्याचं आढळतं. पेशवाईत सरखेल कान्होजी आंग्रेंनी प्रतापगडाच्या तुळजाभवानी संस्थानाला देणग्या दिल्याची कागदपत्रे आहेत. थोडक्यात, या मंदिराच्या इतिहासात मराठ्यांच्या राजवटीच्या चढ-उतारांचं प्रतिबिंब पहायला मिळतं.

शिवाजी महाराजांना आणि स्वराज्याला संपविण्याचा विडा उचलून अफझलखान विजापुराहून निघाला. त्याने मराठ्यांची आराध्य देवता असलेल्या तुळजापूरच्या भवानीची मूर्ती आणि मंदिर भग्न केले. अफझलखानाचा महाराजांनी प्रतापगडाखाली वध केला १० नोव्हेंबर, १६५९ रोजी. आणि त्यानंतर त्याच प्रतापगडावर तुळजाभवानीची प्रतिष्ठापना करून उचित न्याय केला. तेच हे तुळजाभवानीचे मंदिर.

प्रतापगडावर श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याचे महाराजांनी ठरवले. त्यानुसार मंबाजी नाईक पानसरे यांनी हिमालयातील राजे लीलासेन यांच्या राज्यात जाऊन त्यांच्या सहाय्याने हिमालयातील त्रीशुलगन्डकी, श्वेतगंडकी व सरस्वती या नद्यांच्या संगमातून शाळीग्रामाची उत्तम शिला मिळवली. मूर्ती घडवण्यासाठी त्याच प्रांतातील कुशल शिल्पकारांकडून अतिशय परिश्रमपूर्वक श्री तुळजाभवानीमातेच्या मूर्तीच्या मूळ प्रतिकृतीबरहुकूम विलोभनीय मूर्ती घडविली. साधारण दोन फूट उंचीच्या देवीच्या मूर्तीच्या मस्तकावरील मुकुटावर शिवलिंग असून ही भवानी माता अष्टभुजा महिषासुरमर्दिनी स्वरूपात आहे. देवीच्या आठही हातांत शस्त्रे आहेत. डाव्या व उजव्या बाजूस सूर्य-चंद्र झळकत आहेत. अशी ही अतिशय प्रसन्नवदन मूर्ती प्रथम राजगडावर आणण्यात आली. तेथे प्रथम शिवाजी महाराजांनी तिचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रतापगडावर मोरोपंत पिंगळे यांच्याबरोबर मूर्ती प्रतापगडी पाठवण्यात आली. शिवरायांच्या आज्ञेवरून मोरोपंतांच्या हस्ते समारंभपूर्वक देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली (जुलै १६६१). शिवाजी महाराजांनी देवीस नाना प्रकारचे रत्नजडित अलंकार, भूषणे वगैरे करून दिली. उदंड दानधर्म केला.

महाराजांनी श्री भवानी देवीच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र संस्थानच स्थापून दिले. श्री भवानी मातेची पूजाअर्चा, उत्सव, इत्यादीबद्दलची पद्धत घालून दिली. महाल, मोकासे, सनदा देऊन देवीच्या संस्थानाच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र हवालदार, मुजुमदार, पेशवे, फडणीस, पुजारी, सेवेकरी, वगैरे नेमणुका वंशपरंपरेने करून दिल्या. महाराज स्वत:ला देवीचे भोपे म्हणजे पुजारी म्हणवत. या भोपेपणाची मुतालिकी म्हणजे प्रतिनिधित्व मंबाजी नाईक पानसरे यांना देण्यात आली. देवीच्या नित्य पूजेसाठी वेदशास्त्र संपन्न विश्वनाथभट हडप यांची नेमणूक करण्यात आली.

एक नवे अधिष्ठानच प्रतापगडावर संस्थापिले गेले. महाराजांनी ८००० होनाचे वार्षिक उत्पन्न या संस्थानासाठी करून दिले. देवीच्या खर्चासाठी १५ गावांचा महसूल नेमून देण्यात आला. त्याचप्रमाणे पार घाटातून येणाऱ्या व जाणाऱ्या मालावरील जकातीपैकी दर बैलास एक रुका देवीला उत्पन्न म्हणून मिळू लागला. गडावरील देवळात दररोज त्रिकाळ चौघडा, पूजा, नैवेद्य, पुराण, पाठ, गोंधळ सुरू झाले. नवरात्राचा उत्सव थाटामाटात साजरा होऊ लागला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या संस्थानातील पूजा उत्सव करण्यासाठी नियमावली करण्यात आली. या सर्वांवर देखरेख ठेवणारा देवीचा व्यवस्थापक म्हणजे, हवालदार नेमण्यात आला. देवीची नित्यपूजा, सुर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर चौघडावादन, देवीची पंचामृतपूजा, अभ्यंगस्नान, स्नानाचे वेळेस आरती होई. मंदिरासमोर प्रतिदिनी सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर तसेच प्रत्येक मंगळवारी, प्रत्येक प्रहरीचे आरंभी चौघडा वाजविला जाई. दररोज देवीची पंचामृत पूजा होत असे. अभंगस्नानास सुवासिक तेल व उष्णोदक असे. स्नानाचे वेळेस आरती होई व त्यावेळी वाजंत्री वाजविली जात. प्रतिदिनी सायंकाळी देवीला मुजरा करण्यासाठी मशालजी, शिंगाडे यांच्यासह गडावर असलेले सर्व स्थानिक लोक व मानकरी उपस्थित असत. रात्रीच्या वेळेस देवीस पूजक मुखवस्त्र घालीत. शेजारीच असलेल्या पलंगावर देवीच्या पादुका ठेवल्या जात. देवीला झोपविले जाई. भल्या पहाटे हवालदार देवीचे मुखवस्त्र काढून देवीला जागे करीत. प्रत्येक पौर्णिमेस उत्सव असे. त्यावेळी देवीचा गोंधळ केला जाई. पालखीत देवीच्या पादुका ठेवून मंदिराभोवती शिंगे, कर्णे, संबळ वगैरे वाद्यांच्या गजरात पालखीच्या पाच प्रदक्षिणा होत. पालखीच्या भोयांचे पायांवर दूध व पाणी घातले जाई. तेच देवाचे पाय असे समजत. कोजागिरीला दुग्धपान असे. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री देवळासमोरील दीपमाला प्रज्वलित केल्या जात. नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होई. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत दहा दिवस उत्सव असे. नवरात्रात घटस्थापना, होमहवन, शतचंडी, त्रिकाल पूजा, नैवेद्य, गोंधळ, कीर्तन, पुराण होत असे. विजयादशमीची पालखीची मिरवणूक पालखीच्या माळापर्यंत, म्हणजे अफझलखानाच्या कबरीपर्यंत नेत. गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तीचा रंग लालभडक व उंची एक हात चार बोटे हे ठरलेले होते. गोकुळ अष्टमीला दहीहंडी होई. रामनवमीचा उत्सवदेखील साजरा होई.

६ जून १६७४ या सोन्याच्या दिवशी शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले. त्यापूर्वी ते १९ मे १६७४ रोजी महाराज प्रतापगडावर श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. दोन-तीन दिवस त्यांचा मुक्काम प्रतापगडावर होता. महाराजांनी स्वतःच्या मस्तकी छत्र धारण करण्यापूर्वी देवीला सोन्याचे छत्र अर्पण केले. या छत्राचे वजन होते सव्वा मण. या छत्राची त्या काळातील किंमत होती ५६००० रुपये. भवानी मातेला राज्याभिषेकाचे आमंत्रण देऊनच महाराज रायगडावर परत आले (२१ मे १६७४).

भवानीच्या दर्शनाकरिता प्रतिदिनी येणाऱ्या भाविकांसाठी छत्रपतींनी अन्नछत्र सुरू केले. या अन्नछत्रात कोरडा शिधा भाविकांना दिला जात असे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना देण्यासाठी हवालदार पानसरे व पूजक हडप यांच्यामार्फत हा शिधा देण्यात येई. या अन्नछत्राची व्यवस्था कशी असावी, हे महाराजांनी मंबाजी नाईकांना लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते. (१४ जून १६७९).

२ जुलै १६८० श्रावण शुद्ध या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक झाला. संभाजीराजांचा राज्यकारभार सुरू झाला. पुढच्याच महिन्यात प्रतापगडच्या भवानीमातेला दरवर्षी दहा हजार होन देणगी दिल्याचे शिक्का मोर्तबाचे पत्र त्यांनी करून दिले.(ऑगस्ट, १६८०)

मोगलांनी इ.स.१६८९ साली रायगडानंतर प्रतापगड सर केला. त्यापूर्वी ५ एप्रिल १६८९ रोजी छत्रपती राजाराम रायगडाच्या वेढ्यातून निसटून प्रतापगडावर आले. या वेळी भवानीमातेची मूर्ती मोगलांच्या संसर्गापासून संरक्षित ठेवण्यासाठी गुप्त ठिकाणी हलविण्यात आली. हे ठिकाण पार गावातील रामवरदायिनी मंदिरातील तळघरात असल्याचे सांगण्यात येते. पुढे अवघ्या तेरा महिन्यांतच मराठ्यांनी औरंगजेबाकडून प्रतापगड जिंकून घेतला. गडावर पुन्हा देवीची स्थापना करण्यात आली. देवीचे पूजक, हवालदार, सबनीस वगैरे मानकरी रुजू झाले. त्यांना नख्त नेमणुका करून देण्यात आल्या. देवीची नित्यपूजा आणि धार्मिक विधी पूर्वीप्रमाणे यथासांग सुरू झाले. या वेळी देवीकडील खर्चाची व्यवस्था नीट व्हावी म्हणून मौजे कवडी हा गाव इनाम देण्यात आला.(इ.स.१६९१)

पुढे राजाराम महाराज, महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र शिवाजीराजे दुसरे यांस घेऊन कोकणची स्वारी करून प्रतापगडास गेले. तेथे श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन हेळवाक येथे गेले. त्या ठिकाणी त्यांना विशालगडावर असलेल्या महाराणी राजसबाईसाहेब यांचे पोटी संभाजी राजे (द्वितीय) यांचा जन्म झाल्याचे वर्तमान आले (२३ मे १६९८). या संभाजी राजांचे जावळ काढण्याचा विधी राजाराम महाराजांनी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात केल्याची नोंद सापडते. महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराजांपासून ते छत्रपती प्रतापसिंह महाराजांपर्यंत सर्व छत्रपतींनी या देवस्थानाला श्रद्धापूर्वक सनदा व भेटवस्तू अर्पण केल्याचे जुन्या कागदपत्रांवरून दिसून येते.

श्री भवानी मातेच्या या संस्थानाची सबनिशी रामचंद्रपत अमात्य यांच्याकडे होती. २१ मे, १६९८ रोजी रामचंद्रपंत अमात्यांनी येसाजी पानसरे हवालदार यांना लिहिलेल्या पत्रात बाळाजी विश्वनाथ यांना 'कामाचा मर्दाना देखुन सबनिशीची मुतालकी देऊन'... म्हणजे प्रतिनिधी म्हणून पाठवत आहे. त्यांजकडून सबनिशीचे काम करून घेणे, असे सांगितलेले आढळते. बालाजी विश्वनाथ पेशवे यांच्या चरित्रातून याबाबत दुजोरा मिळत नसला तरी पत्र अस्सल असल्याने याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे.

सरखेल कान्होजी आंग्रे हेदेखील देवीचे भक्त होते. त्यांनी देवीला त्यांच्या वतनातील मौजे कापडे खुर्द, मौजे देवळे व मौजे चरई ही तीन गावे इनाम दिल्याची नोंद सापडली आहे.

पेशवेकाळात पुण्याहून देवीला दरवर्षी देवीसाठी त्याचप्रमाणे पुराणिक, उपाध्ये व हवालदार यांच्यासाठीही वस्त्रे पाठविली जात असल्याची माहिती जुन्या कागदपत्रातून मिळते. ही प्रथा पेशवाईनंतरही सुरू होती हे २२ जुलै १८२४ च्या पत्रावरून स्पष्ट होते.

आणखी एका गोष्टीकडे आपले लक्ष वेधून घ्यावेसे वाटते. या श्री भवानी मातेच्या मंदिराचे बांधकाम आणि रायगडावरील श्री जगदीश्वराच्या मंदिराचे बांधकाम या दोहोंत अतिशय साम्य आढळून येते. मंदिराच्या दीपमाळेमधील देवळ्या, बाहेरील बाजूस छताकडील नक्षीकाम, ओवऱ्या इत्यादी गोष्टी पाहिल्यावर हा समज आणखीन दृढ होतो. जगदीश्वर मंदिराचे बांधकाम हिरोजी इंदलकरांनी केल्याचे तेथील शिलालेख सांगतो. कदाचित प्रतापगडावरील मंदिरदेखील हिरोजींनीच बांधले असण्याची शक्यता आहे.

सातारा व कोल्हापूरच्या राजघराण्यांचे हे कुलदैवत आहे. सातारकर छत्रपतींचे हे खासगी देवस्थान आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या घराण्यातर्फे या देवीचे वर्षभरातील सर्व कार्यक्रम पार पाडले जातात. दरवर्षी नवरात्रात मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी प्रतापगडाला आवर्जून भेट देतात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी येथे एक प्रथा सुरू केली आहे. नवरात्रात चवथ्या माळेला रात्री प्रतापगडावर महाराष्ट्राच्या विविध भागातून शेकडो शिवप्रेमी येतात. देवीच्या देवळाभोवती पारंपरिक वेशभूषा करून हे भक्त पेटत्या मशाली घेऊन देवीची पदे म्हणत रात्रभर नाचत जागर करतात. गड जागता ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघते. ही प्रथा गेली ४७ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. गेली तीन वर्षे गडाच्या तटबंदीवर साडेतीनशे मशाली लावून गड उजळवण्यात येतो. गडावर राहणारे चंद्रकांत उत्तेकर आणि त्यांचे सहकारी हा उपक्रम स्वखर्चाने करीत असतात.

महाराष्ट्राच्या इतिहासात मानाचं असलेल्या प्रतापगडावरील हे मंदिर शिवप्रेमी आणि अभ्यासकांना खुणावत आहे. प्रतापगडाच्या भेटीत या मंदिराविषयी जाणून घेणंही तेवढंच रोचक ठरावं.
===========


नरवीर चिमाजीअप्पा पेशवे यांनी सन १७३९ मध्ये म्हणजे बरोबर २७५ वर्षांपूर्वी वसई भागात पोर्तुगीजांवर ऐतिहासिक विजय मिळवला. हा प्रदीर्घ, चिवट लढा सुमारे २५ महिने चालला होता. मराठी दौलतीसाठी एका चिवट परकीय सत्तेविरुद्ध लढताना त्यांनी या सत्तेने तोवर केलेला अनन्वित ‌धार्मिक अनाचार वा जुलमाचा हिशेब चुकता केला. या पोर्तुगीज सत्तेला धडा शिकवून त्यांच्या प्रबळ धार्मिक व राजकीय महत्त्वाकांक्षांना मर्यादा घातल्या.

सन १७३४ जानेवारीमध्ये मराठ्यांचे सैन्य सिद्दींवर चालून आले असता, पोर्तुगीज वरकरणी मदतीचे नाटक करीत व आतून इंग्रजांकरवी सिद्दीस मदत करीत. पण पेशव्यांनी त्यांचे काही किल्ले व आरमार मिळवले आणि ते मानाजी आंग्रेंच्या स्वाधीन केले. थोरल्या बाजीरावांना कुलाब्यासारखे एखादे बंदर ताब्यात हवे होते. कारण त्यांचे राजकीय महत्त्व व व्यापारी महत्त्व ते जाणत होते. त्यामुळे ते मानाजीस मदत करीत होते.


बाजीरावांनी वसईच्या पोर्तुगीजांकडे कल्याण व भिवंडीच्या व्यापाऱ्यांसाठी वसईत एक वखार बांधण्यासाठी जागा मागितली होती. ती न देता उलट खुद्द बाजीरावांना उद्देशून 'निग्रो' असा अपमानास्पद शब्द वापरला. त्यामुळे मराठे चांगलेच क्षुब्ध झाले. सन १७३६ मध्ये सातव्या सिद्दीने मानाजी आंग्रेंवर हल्ला केला. दरम्यान थोरल्या बाजीरावांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी सिद्दीचा पराभव केला. १७३६ मध्ये या सर्व पार्श्वभूमीवर वसईवर स्वारी होणार, हे अपेक्षित होते. तशी कुणकुण पोर्तुगीजांना लागल्याचे पत्रव्यवहारांतूनही दिसते. या दरम्यान थोरले बाजीराव हे निजाम व उत्तरेतील राजकारणात व्यग्र असल्याने, त्यांनी आपले धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसईच्या मोहिमेवर १७३७ मध्ये मोठी फौज पाठविली.

एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी कळव्यातील 'सां - जेरो निमू' हा पाणबुरुज काबीज करून ठाण्यात प्रवेश केला. पुढे त्यांनी सर्व साष्टी बेट व्यापले. यामुळे पोर्तुगीजांकडे केवळ वांद्रे, डोंगरी, वर्सोवा, उरण, तारापूर व वसईचा किल्ला एवढीच ठाणी राहिली. वांद्र्याला ऐन वेळी इंग्रज मदतीला आल्याने ते पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले.

मराठ्यांच्या वसईच्या मोहिमेची बातमी गोव्यात पोचल्यावर तेथील व्हाइसरॉय सांदोमिल याने वसईतील अधिकाऱ्यांत बदल केले. मराठ्यांनी वसई किल्ल्यावर जून ते सप्टेंबर १७३७ दरम्यान मध्ये जोरदार हल्ले केले, शिड्या लावल्या; पण माघार घ्यावी लागली. या हल्ल्यामध्ये पाचशेच्या आसपास मराठे कामी आले. या हल्ल्यात बाजीरावांचे खास सहकारी बाजी भिवराव रेठरेकर हेही जखमी झाले. पोर्तुगीज सरदार पेद्रू - द - मेलू हाही जखमी झाला. या हल्ल्यानंतर मराठ्यांनी माहीम, केळवे, डोंगरी आदी ठिकाणांवर वेढा दिला; डोंगरी जिंकण्याचा प्रयत्न केला. चिमाजीअप्पांचा हा प्रयत्न कडदीन (म्हणजे आंतोनिअु कार्दी फ्राइस) याने निष्फळ केला. त्यामुळे चिमाजीअप्पा हळहळले; कारण मनुष्यबळाची खूप हानी झाली. नानासाहेबांना लिहिलेल्या पत्रात ते ही हळहळ व्यक्त करतात. पण पोर्तुगीजांचेही बरेच नुकसान झाले. उत्तम सेनापती असलेल्या कडदीनने गोव्याकडे अधिक सैन्य व पैशाची मागणी केली. पण त्यांनी त्यास प्रतिसाद ‌न दिल्यामुळे वैतागून कडदीनने आपला राजीनामा पाठवला. वसईच्या वेढ्यात यश येत नाही, हे पाहून पोर्तुगीजांच्या इतर राहिलेल्या मुलखावर मराठ्यांनी हल्ले केले व त्यात त्यांना यशही आले.

या दरम्यान, चिमाजीअप्पा पुण्याला आपल्या वडील बंधूंची भेट घेण्यास गेले. त्या भेटीअंती बाजीरावांनी व्यंकटराव घोरपडे व दादाजीराव भावे-नरगुंदकर या सरदारांना जानेवारी १७३९ मध्ये गोवा-साष्टी घेण्यास कूच करण्यास सांगितले. कारण वसईला समुद्रमार्गे रसद व कुमक मिळे. ती बंद करण्याकरता केलेली ही थोरल्या बाजीरावांची खेळी कमालीची यशस्वी झाली.

दरम्यान, चिमाजीअप्पा परत नव्या आठ हजारांच्या स्वारांसह व पिलाजीराव जाधव, शंकराजीपंत यांच्यासह परत मोहिमेत रुजू झाले. त्यांनी माहीमच्या किल्ल्यावर प्रखर हल्ला केला. अग्निवर्षाव केला. मनुष्यहानी झाली. शेवटी पोर्तुगीज किल्लेदार पेरैर याने शरणागती पत्करली. मराठ्यांच्या या हल्ल्यात अनेक पोर्तुगीजांना कंठस्नान घालण्यात आले. पुढे माहीमनंतर केळवे, शिरगाव घेऊन मग अप्पासाहेब तारापुरास गेले. तारापूरचा किल्ला घेण्यात फेब्रुवारी १७३९ मध्ये बाजी ‌भीवराव यांना यश आले; पण त्यात त्यांना वीरमरण आले. हीच ती प्रसिद्ध तारापूरची लढाई!

तारापूरचा किल्ला हे बळकट ठिकाण होते. कोट, बाहेर मोठा खंदक व कोटाच्या आत भक्कम मेढा होता. त्यामुळे हा किल्ला काबीज करणे फारच दुर्घट होते. मराठ्यांनी किल्ल्यास वेढा देताच वातेऱ्या बांधल्या व तोफा चढवून अहोरात्र मारा सुरू केला. सुरुंगाचीही सिद्धता केली. रात्रीच लष्कराचे सर्व मनुष्यबळ, हशम खाडीतून उतरून अप्पासाहेबांनी मोर्चाच्या ‌पाठीमागे जमा करून बसविले. हुजरातीच्या निशाणाभोवती बाजी भीवराव, रामचंद्र हरी, बाळोजी चंद्रराव, गोविंद हरी पटर्वधन, तुकोजीराव पवार व त्यांच्यापलीकडे राणोजी शिंदे याप्रमाणे मोर्चे होते. मल्हारराव होळकर अप्पासाहेबांबरोबर होते. पुढे दिवसा सुरुंगाचा स्फोट होताच मराठे सैन्य किल्ल्याच्या कोटात घुसले. फार मोठे युद्ध सुरू झाले. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार हा किल्ला घेण्याची जणू भीष्मप्रतिज्ञाच बाजी भीवराव रेठरेकरांनी घेतली होती. 'तारापूरच्या तटावर जरीपटका फडकावूनच अन्नाचा घास घेईन,' अशी खूणगाठ बांधून हा रणमस्त वीर एकसारखा लढत होता. शत्रूची फळी भेदून तो निशाण चढविण्यासाठी एखाद्या सिंहाप्रमाणे तटावरून जात असताना एक गोळी सणसणत येऊन बाजी भीवरावांस लागली. तो खाली पडल्याचे त्याच्या बापूजी या मुलाने पाहिले. तो त्याच्या बापाजवळ आला. त्याला पाहताच बाजी भीवराव त्यास म्हणाला, 'बेटा रडू नको. हे निशाण गडावर चढव, तरच तुझा बाप सुखाने मरेल!' बाजी भीवरावचा मुलगा केवळ अठरा वर्षांचा होता. तोही या सिंहाचा बच्चा होता. तो त्या तटावरून शत्रू कापीत चालला... सर्व मराठे हिरिरीने लढले व अखेर बापूजीने जरीपटका तटावर फडकावला व वडिलांची भीष्मप्रतिज्ञा पूर्ण केली! बाजी भीवरावाने पुत्राच्या मांडीवर आनंदाने प्राण सोडले.

तारापूर फत्ते झाल्याचे; पण आपला बालमित्र बाजी भीवराव पडल्याचे जेव्हा थोरल्या बाजीरावांस कळले, तेव्हा त्यांना अतीव दु:ख झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सांत्वनपर पत्र त्यांनी त्यांच्या मातुःश्री वेणूबाईंना लिहिले. त्यात ते म्हणतात, 'आता मीच तुमचा बाजीराव असा विवेक करून धीर धरावा.'

तारापूरनंतर वांद्रे, डोंगरी आदी ठाणी मराठ्यांनी घेतली. काही पोर्तुगीजांनी सोडून दिली व लढा वसईवर पुन्हा केंद्रित झाला. फेब्रुवारी-मार्च १७३९ मध्ये इकडे गोव्यामध्येही मराठा फौजांना अपूर्व यश आले. अर्धा-अधिक गोवा त्यांनी जिंकला व मार्चमध्ये त्यांच्यात तहही झाला. त्यात वसईसह सर्व उत्तर भाग मराठ्यांना देण्याचे ठरले. पण तिकडे चिमाजीअप्पांना काहीच माहिती नसल्याने वसईतील वेढा व युद्ध सुरूच राहिले.

एप्रिल १७३९ मध्ये वसईचा जनरल मार्तिजू-द-सिल्व्हैर मराठ्यांच्या गोळीचा बळी ठरला. त्याची जागा कायतान पेरैरने घेतली. त्याने लिहिलेल्या एका पत्रात त्याने मराठ्यांच्या युद्धनैपुण्याची खूप स्तुती केली आहे. लवकरच पन्नास हजारांवर सैन्याचा वसईवर हल्ला होणार असल्याचे तो म्हणतो. त्याप्रमाणे खरोखरच चिमाजीअप्पांच्या नेतृत्वाने मे महिन्यात वसईच्या मुख्य बुरुजांवर - सेबेस्टियन व रेमेदिअसवर - अनुक्रमे अकरा व सहा मोठे हल्ले केले व त्या दरम्यानच्या तटाला भगदाड पाडले. त्यातून मराठी सैन्याने आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान झाले.

पोर्तुगीजांनी तोफांनी मारा केला, तरीही मराठी सैन्य हटले नाही. फार मोठी जीवितहानी झाली. त्यामुळे यापुढे वसईचा किल्ला राखणे अशक्य आहे, असे वाटल्याने कायतान-द-सौझ परैरे याने प्रमुख लोकांशी विनिमय करून १६ मेला पोर्तुगीजांतर्फे पांढरे निशाण लावले. त्यानुसार युद्धबंदी व पुढे तह झाला. २३ मे १७३९ ला चिमाजीअप्पांनी किल्ल्याचा ताबा घेतला. (पोर्तुगीज-मराठे संबंध पान क्र. १६५) दोन-तीनशे वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. वसईवर निशाण चढविल्यावर अप्पासाहेबांनी रीतसर धार्मिक कृत्ये, होमहवन केले, अशी नोंद आढळते.

पेद्रो बार्रात हा शत्रूचा सरदार पेशव्यांकडे ओलीस म्हणून राहिला. फिरंगी लोक निशाणे सोडून बँड वाजवत बाहेर पडले व गलबतात बसून निघून गेले.

चिमाजीअप्पांनी याबाबत पुण्यश्लोक शाहू महाराज यांना एक पत्र लिहिले. त्यात ते लिहितात, 'वसई घेतल्यामुळे महाराजांची कीर्ती समुद्र वलयांकित, पृथ्वीप्रफुल्लित झाली आहे. फिरंगी यांनीही हिंमत धरून शिपाईगिरी केली. दीड प्रहरपर्यंत आगीचा मारा पर्जन्य केला. इतकी आग पिवून मराठे फौजेने दम धरला. असे जाहले नाही (अशी) सीमा केली.'

वसईच्या या रणसंग्रामातील विजयाने काही गोष्टी अधोरेखित झाल्या. चिवट व धर्मांध राजवट असलेल्या पोर्तुगीज राजवटीच्या उत्तरेकडील विस्ताराला त्यांच्या धार्मिक व राजकीय महत्त्वाकांक्षांना कायमचा पायबंद बसला व धार्मिक जुलूम थांबला. अशा या मोहिमेच्या विजयाच्या द्विशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, आपण या सर्व वीरांचे पुण्यस्मरण करून आपण आपला संतांना वंदन व वीरांचे स्मरण हा वारसा तरी किमान पुढे चालवू.

संदर्भ ग्रंथ

१) छत्रपती संभाजी महाराज - ले. वा. सी. बेंद्रे , २) पोर्तुगीज व मराठे संबंध - ले. पांडुरंग पिसुर्लेकर , ३) वसईची मोहीम - ले. य. न. केळकर
===========

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट मांडणारी तसेच इतिहास अभ्यासात समकालीन संदर्भ म्हणून ग्राह्य धरली जाणारी कृष्णाजी अनंत सभासद विरचित ‘आद्य छत्रपती शिवाजीराजे यांची बखर’ हा संदर्भग्रंथ अभ्यासकांसाठी उपलब्ध झाला आहे. वरदा प्रकाशनने या बखरीचे पुनर्मुद्रण केले आहे.
शिवछत्रपतींचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात सभासद बखर लिहिण्यात आली. छत्रपती राजाराम महाराज कर्नाटकात जिंजीला जाताना त्यांच्यासोबत जी माणसे होती त्यात कृष्णाजी अनंत सभासद होते. ते कर्नाटकचे माहीतगारही होते. त्यांनी ही बखर लिहिली आहे. या बखरीमध्ये ‘पूर्वजवृत्त आणि शिवाजी महाराजांचा कार्यारंभ’, ‘शिवाजी महाराज आणि अफजलखान’, ‘प्रतापगडावर देवीची स्थापना आणि कारभारव्यवस्था’, ‘शास्ताखान आणि राजा जयसिंग यांची स्वारी’, ‘आग्रा जाण्याविषयी करार’, ‘आग्र्यास जाणें आणि येणे’, ‘आदिलशाहीशी युद्ध’, ‘मोगलांशी तह आणि बिघाड’, ‘आदिल व मोगलशाहीशी युद्ध’, ‘राज्याभिषेक’, ‘उभयता छत्रपती भेट’, ‘चंदी, व्यंकोजी आणि संभाजी’, ‘राज्याची मोजदाद’ आणि ‘राजियांचे देहावसान’ अशा चौदा प्रकरणांमध्ये छत्रपतींचा जीवनपट मांडण्यात आला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक शंकर नारायण जोशी यांनी या बखरीचे संपादन केले आहे.
त्याविषयी बोलताना ज्येष्ठ इतिहास आणि दुर्गअभ्यासक महेश तेंडुलकर म्हणाले, ‘शिवकालावार प्रकाश टाकणाऱ्या साधनांमध्ये सर्वाधिक विश्वसनीय म्हणून सभासद बखरीकडे पाहिले जाते. याचे कारण या बखरीत इतर बखरींप्रमाणे दैवी चमत्कार वैगेरे गोष्टी नाहीत. सभासदाने छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी जिंजीला असताना ही बखर लिहिली आहे. सभासदाला त्यावेळी जिंजीत दफ्तर तसेच कागदपत्रे व इतर गोष्टींची उपलब्धता नसल्याने स्मृतींवर भर देऊन हे लिखाण करावे लागल्याचे जाणवते. त्यामुळे काही ठिकाणी प्रसंगांची उलटापालट झालेली दिसते. इतिहासात अभ्यासात अस्सल पत्रांखालोखाल या बखरीला स्थान दिले जाते. या बखरीचे वैशिष्ट्य म्हणजे सभासदाने महाराजांकडे असलेल्या, वसवलेल्या तसेच कर्नाटकातील गडांची नावे दिली आहेत. सभासद म्हणजे राजाला सल्ले देणारा अधिकारी असल्याने तो राजमंडळाच्या जवळचा होता. त्यामुळे दुय्यम दर्जाचे साधन असले तरीही त्याला विश्वसनीयता आहे.’
अनेक दिवस हे पुस्तक अभ्यासकांसाठी उपलब्ध नसल्याने बखरीचे पुनर्मुद्रण केले आहे. शिवपूर्वकाल, शिवकाल आणि पेशवेकालीन महाराष्ट्राविषयीची पुस्तकेही वरदा प्रकाशनने इतिहास अभ्यासकांसाठी उपलब्ध केली आहेत, असे केदार केळकर यांनी सांगितले.
==============



इसवी सनापूर्वीपासूनचा इतिहास लाभलेल्या या अहमदनगरवर राज्य केले निजामशाही, मोगलशाही, मराठेशाही, पेशवाई व ब्रिटीशांनी. पण हा इतिहास सुमारे हजार वर्षांच्या संघर्षाचा आहे. स्वकिय व परकियांची आक्रमणे झेलत, कधी पड खात; तर कधी झोकात-दिमाखात शौर्य गाजवून परतवून लावत येथील सत्ताधीशांनी आपले राज्य चालविले. सत्तासंघर्षातून समाजकारणालाही चालना दिली. जी आजही सुरूच आहे.


'मराठेशाहीचे जननस्थान.... पुण्यभूमी महापावन'....असे वर्णन संतकवी दासगणू महाराजांनी ज्या शहराचे केले, त्या अहमदनगर शहराचा इतिहास उज्ज्वल मानला जातो. येथील सत्तासंघर्षही आगळावेगळाच ठरलेला आहे. सर्वांगीण समृद्ध परंपरा लाभलेल्या या शहराने इतिहास काळात ज्या वेगाने स्वतःची व जनतेची प्रगती साधली, तेवढी स्वातंत्रोत्तर काळात फारशी साधता आली नाही. सगळीकडून दुर्लक्षित असलेली ही भूमी अजूनही संघर्षरतच आहे, स्वअस्तित्वाचा शोध घेतेच आहे. पूर्वीच्या सत्ताधीशांनी सत्ता मिळवून ती टिकविण्यासाठी लढत दिली, तशीच काहीअंशी स्थिती आजही आहे. आजचे सत्ताधीशही आधी सत्ता मिळविण्यासाठी व नंतर ती टिकविण्यासाठीच संघर्ष करण्यात व्यग्र आहेत. मात्र, पूर्वीच्या व आजच्या सत्ताधीशांमध्ये एक मूलभूत फरक आहे व तो म्हणजे- त्या सत्ताधीशांनी सत्तासंघर्ष करताना दुसरीकडे समाजकारणाला गती दिली, पण आताच्या सत्ताधीशांनी समाजकारणाकडे काहीसे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली. त्यामुळेच नगरचे ऐतिहासिक रुपडे व ग्रामीण बाज कालही तसाच होता, आजही तसाच आहे व दुर्दैवाने उद्याही तसाच राहण्याचीच शक्यता आहे.

नगर शहराची मुहूर्तमेढ २८ मे १४९० ला रोवली गेली. त्यानंतर प्रत्यक्षात शहर वसविण्याचे काम चार वर्षांनी म्हणजे १४९४मध्ये सुरू झाले. त्यानंतर तब्बल १४० वर्षे म्हणजेच मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत- सन १६३०पर्यंत नगर शहराने दक्षिण भारतातील राजकारणाची व सत्ताकारणाची सूत्रे हलविली. मराठी राज्याचे बीज नगरच्या निजामशाहीतच रुजल्याचा इतिहास आहे. याच मराठी राज्याचा पुढे छत्रपतींनी विस्तार केल्याचा दिमाखदार लौकिकही आहे.

नररत्नांची खाण

नगरच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम ऐक्य वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. या दोन्ही बाजूंनी परस्परांच्या सहकार्याने देशातील मोगल, आदिलशाही, कुतूबशाही व अन्य बलाढ्य सत्तास्थानांविरुद्ध अथक संघर्ष केला. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजांचे आजोबा मालोजीराजे, वडील शहाजीराजे तसेच मातुलवंशाकडील जाधवराव, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी विठ्ठल सुंदर, त्रिंबकजी डेंगळे या मराठी नररत्नांसह नगरचे भूषण सुलताना चांदबिबी, प्रजाहितदक्ष वजीर मलीकंबर, इतिहासकार फेरिस्ता, मुलूखमैदानी तोफेचा जनक रुमीखान अशा नरवीरांनी नगरचे नाव देशातच नव्हे तर जगभरात स्वतःच्या शौर्याने गाजवले. हा इतिहास नव्या पिढीला पुरेसा ज्ञात नाही. पण म्हणून त्याचे महत्त्व कमीही होत नाही. इतिहास घडवू इच्छिणारांनी आधी इतिहास जाणून घेणे गरजेचे असते, असे बोलले जाते. त्यामुळेच नगरचा उज्ज्वल संघर्षाचा व त्यातून यशाचा देदीप्यमान इतिहास नव्याने नव्या पिढीपर्यंत पोचविण्याची गरज आहे.

प्राचीन समृद्ध परंपरा

निजामशाहीमध्ये नगर शहराची स्थापना झाली असली तरी या शहराचा इतिहास इसवी सनापूर्वीपासूनचा मानला जातो. विंध्य पर्वत व नर्मदा नदीच्या दक्षिणेस असलेल्या नगर प्रांतास त्य़ा काळी दक्षिणपथ म्हटले जायचे. सम्राट अशोक तसेच पैठणचे आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव यांचा अंमल दक्षिणपथावर होता. इसवी सन ११९० ते १३१० या काळात देवगिरीचे यादव यांचे राज्य या भागात होते. १३४६पासून १४९०पर्यंत बहामनी राज्याचा अंमल येथे होता. बहामनी राज्याचे जे पाच तुकडे झाले, त्यापैकीच एक तुकडा म्हणजे नगरची निजामशाही मानली जाते.

सत्तासंघर्षाची परंपरा

नगरची स्थापना निजामशाहीने केली असली तरी या निजामशाहीला येथील सत्ता टिकविण्यात आदिलशाही, कुतूबशाही व मोगलशाहीशी अखंड संघर्ष करावा लागला. पुढे मोगलांनी येथे अंमल बसवला तरी मराठेशाहीने त्यांना सळो की पळो करून सोडले. मराठेशाहीची वाटचाल पुढे पेशवाईच्या दिशेने झाली असली तरी त्यांनाही इंग्रजांशी संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्यक्षातील लढाया झाल्या नसल्या तरी राजकीय अस्तित्वाचा संघर्ष मात्र कायम राहिला व जो आजही सुरूच आहे. स्वातंत्र्यानंतर नवनीतभाई बार्शीकर व २५ वर्षे आमदारकी भोगलेले शिवसेनेचे अनिल राठोड यांचीच ठळक नावे नगरच्या स्वातंत्रोत्तर राजकीय इतिहासात दिसतात. अर्थात अन्य मंडळीही टप्प्या टप्प्याच्या काळात नगरच्या राजकीय क्षीतिजावर चमकली. पण बार्शीकर व राठोडांच्या काळात गाजलेल्या नगराची स्थिती अन्य कोणत्याही काळात फारशी अनुभवास आली नाही. नगरची सत्ता नेहमीच सूळावरची पोळी मानली गेली आहे. इतिहासातील घटनांनी तसा दाखला दिला आहे. पण या सत्तेचा मोह कोणालाही सुटलेला नाही, हेही यातूनच स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच येथील ही सत्तासंघर्षाची परंपरा अबाधीतच राहिली आहे.

नगरचे सत्ताधीश व त्यांचे कार्य

> निजामशाहीची सुरुवात १४९०मध्ये नगरला झाली. अहमद निजामशहा हा बेदरच्या बहामनी राज्याचा वजीर निजाम उल्मुल्क बहिरी याचा मुलगा. बहिरी हा पूर्वीश्रमीचा तमाभट वल्लद बहिरूभट हा पाथरी गावचा ब्राह्मण कुलकर्णी होता. अहमदशहा बहामनी याने विजयानगरवर हल्ला केला त्यावेळी गुलाम म्हणून तो सापडला. पुढे ते सरदार झाला. याच सरदाराचा मुलगा म्हणजे अहमद निजामशहा. त्याने बहामनी राज्यातील तेलंगणचा सुभेदार जहांगीरखान याचा हल्ला जेथे परतवून लावला तसेच बहामनी राज्यावर जेथे जय मिळविला, त्या ठिकाणी नगर शहराची स्थापना १४९०मध्ये केली. कोटबाग निजाम अशी वास्तू यानिमित्ताने उभारली. तीच पुढे नगरचा भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध झाली. १५०८पर्यंत अहमद निजामशहाचे नगरवर राज्य होते. या काळात मर्दानी खेळांना त्याने प्रोत्साहन दिले. या काळातच नगर शहराची बगदाद व कैरो या शहरांशी तुलना होत होती.

> अहमद निजामशहानंतर त्याचा मुलगा बुऱ्हाणशहा नगरच्या गादीवर बसला. १५०८ ते १५५३ हा त्याचा सत्ताकाळ. पण गादीवर बसतेवेळी तो अल्पवयीन असल्याने तरुण होईपर्यंत व त्यानंतरही त्याला स्वकियांशी सतत संघर्ष करावा लागला. यात एकदा त्याला नगर सोडून जुन्नरला पळूनही जावे लागले. स्वकियांशी सतत झुंज सुरू असतानाही बुऱ्हाणशहाने विद्याव्यासंग व परधर्म सहिष्णुतेला महत्त्व दिले. हिंदू व पोर्तुगीज सरदारांच्या मदतीने त्याने राज्यशकट हाकले. बुऱ्हाणशहाच्या सत्तेचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात मोठी 'मुलुखमैदान तोफ' तसेच दुसरी 'धूळधाण तोफ' नगरला ओतली गेली. तुर्की रुमीखान याच्याकडून या दोन्ही तोफांची निर्मिती १५५०मध्ये करविली गेली. 'मुलुख मैदान' तोफ सध्या विजापूरला आहे. बुऱ्हाणशहाच्या काळातच फराबाग या राजवाड्याची निर्मिती झाली.

> बुऱ्हाणशहानंतर त्याचा मुलगा हुसेन निजामशहा नगरच्या गादीवर बसला. १५५३ ते १५६५ असा अल्पकाळ त्याला लाभला. आदिलशाही व कुतूबशाहीशी संघर्ष त्याला करावा लागला. याच काळात नगरच्या भुईकोट किल्ल्याचा कायाकल्प झाला. दगडी तट, अर्धचंद्राकृती २२ बुरूज, तटाभोवती खोल खंदक केला गेला. याच हुसेन निजामशहाची कन्या सुलताना चांदबिबी. सौंदर्य, बुद्धीमत्ता व शौर्यगुण असलेल्या चांदबिबीचे फारसी, अरबी, मराठी व कानडी या भाषांवर प्रभुत्व होते. १५७१मध्ये विजापूरचा अली आदिलशहा याच्याशी तिचा विवाह झाला व १५८५पर्यंत ती विजापूर येथेच होती.

> हुसेन निजामशहानंतर दिवाणा मुर्तजा हा त्याचा अल्पवयीन मुलगा सत्तेवर आला. १५६५ ते १५८५ या काळात पोर्तुगीज व कुतुबशाहीशी त्याला संघर्ष करावा लागला. अकबराचे मोगल सैन्यही निजामशाहीवर चालून आले होते. मुलगा मिरान हुसेन याच्याशीही त्याला संघर्ष करावा लागला.

> दिवाणा मुर्तजानंतर त्याचा मुलगा मिरान हुसेन याने १५८६ ते १५८८ या दोन वर्षात सत्ता उपभोगली. स्थानिक व परदेशी मुस्लिमांतील संघर्ष या काळात रंगला. त्याचा वजीर मिर्झा खान यानेच नंतर मिरान हुसेनचा चुलतभाऊ इस्माईल याला गादीवर बसविण्यासाठी प्रयत्न केले. १५९०पर्यंत इस्माईलचा कार्यकाळ होता. या काळात भातोडीचा तलाव, शहापूरची मशीद बांधली गेली. पूर्वेस तिसगाव वसवले गेले.

> मूर्तिजा निजामशहाचा भाऊ बुऱ्हा हा निजामशाहीतून पळून जाऊन अकबराच्या आश्रयास होता. त्याचा मुलगा इस्माईल नगरच्या सत्तेवर असतानाही त्याने नगरवर हल्ला केला व इस्माईलला कैदेत टाकून राज्यपद मिळविले. १५९१ ते १५९४ असे बुढ्ढा बुऱ्हाण (दुसरा) याचे राज्य येथे होते. त्याच्यावर त्याचाच मुलगा इस्माईलने नंतर हल्ला केला. मात्र, नंतर बुढा बुऱ्हाणचा दुसरा मुलगा इब्राहिम नगरच्या गादीवर बसला. पण आदिलशाहीवरील हल्ल्यात तो मारला गेल्याने त्याचा मुलगा बहादूरला गादीवर बसविण्यात आले. पण अंतर्गत संघर्षात तोही बंदिवान झाला.

> बहादूरच्या काळातच विजापूरला असलेली सुलताना चांदबिबी पुन्हा नगरला परतली. मोगलांशी तिने संघर्ष करून नगरचे निजामशाहीचे राज्य टिकवले. अकबराचा मुलगा मुरादने प्रचंड सैन्यानिशी भुईकोट किल्ल्यावर हल्ला केला. भुयारी सुरुंगाने किल्ल्याच्या तटाला खिंडार पाडले. पण चांदबिबीने रात्रीतून ते खिंडार बुजविले. मोगलांनी नंतर माघार घेतली. पुढे चांदबिबीने बहादूरला गादीवर बसवले १५९४ ते १६०० असा काळ त्याचा होता. मात्र, याच काळात मोगलांचे हल्ले नगरवर होत होते. चांदबिबीच्या निधनानंतर बहादूरही कैद झाला व नगर मोगलांच्या ताब्यात गेले.

> मोगलांनी १६००मध्ये नगरवर वर्चस्व मिळवले असले तरी पुढची ३७ वर्षे त्यांना पूर्ण वर्चस्वासाठी संघर्ष करावा लागला. मलिकंबर व शहाजी भोसले या कर्तबगार सरदारांनी मूर्तिजा दुसरा हुसेन याच्या नेतृत्वाखाली सत्ता संघर्ष जारी ठेवला. मलिकंबरने मोगलांचा पराभव करून नगरवर पुन्हा निजामशाहीची स्थापना केली. मोगल व आदिलशाहीशी संघर्ष निरंतर सुरू राहिला. नगरपासून १० मैलावर असलेल्या भातोडीचा १६२४चा रणसंग्राम गाजला. यात रणसंग्रामात शहाजी भोसलेंचा पराक्रम सिद्ध झाला. निजामशहाने 'सर लष्कर' असा किताब त्यांना दिला. निजामशाहीच्या रक्षणासाठी शहाजी भोसलेंनी निरंतर प्रयत्न केले. दिल्लीतील जहांगीर बादशहाचा मुलगा शहाजहान नियमितपणे निजामशाहीवर हल्ले करीतच होता. मात्र, १६३६मध्ये निजामशाही मोगलांच्या साम्राज्यात विलीन झाली.

> १६३३ ते १७५९ या काळात मोगलांचा अंमल नगरवर होता. शहाजहानचा मुलगा औरंगजेब हा पहिला सुभेदार होता. निजामशाहीचे संरक्षक शहाजीराजांचे चिरंजीव शिवाजी महाराज यांनी १६५७मध्ये मोगलांवर पहिला हल्ला केला. अहमदनगर प्रांत हा भोसल्यांचा मूळ वतनाचा असल्याने तो मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. १६६३मध्ये मराठ्यांची दुसरी स्वारी नगरवर झाली.

> दिल्लीत औरंगजेबाचे राज्य आल्यावर त्याने नगरवर विशेष लक्ष केंद्रीत केले. या माध्यमातून दक्षिण भारतावर वर्चस्व मिळविण्याचे त्याचे प्रयत्न होते. पण छत्रपती संभाजी राजांशी त्याला संघर्ष करावा लागला. अखेर १७०७मध्ये औरंगजेबाचा नगरमध्येच अंत झाला. त्यानंतर १७५९पर्यंत येथे मोगलांचा अंमल असला तरी मराठ्यांचा त्यांच्याशी संघर्ष सुरूच होता.

> १७५९मध्ये मराठेशाहीचा अंमल नगरवर सुरू झाला. नारो बाबाजी हा सुभेदार होता. न्यायदानात नैपुण्य दाखविताना जमीनधार्यात सुधारणा त्याने केली. नगरचे काळेश्वर मंदिर त्यानेच उभारले. पुढे १७९७मध्ये पेशवाईचा अंमल नगरवर आला. १८०३पर्यंत नगरवर शिंदेशाहीचे राज्य होते. पेशवाईचे आधारस्तंभ नाना फडणवीस या काळात नगरच्या किल्ल्यात बंदिवान होते.

> शिंदेशाहीच्या काळात १७९८मध्ये इंग्रजांनी नगरवर हल्ला केला. गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीने नगर शहरावर तीन बाजूंनी मारा केला. नियमित हल्ले करीत अखेर १८१७मध्ये इंग्रजांनी नगरवर पूर्ण अंमल बसवला. १९४६पर्यंत येथे इंग्रजांचे राज्य होते. या राज्याच्या काळात जनतेला ब्रिटीशांच्या अन्याय अत्याचारांसह दुष्काळाचाही सामना करावा लागला. १८५७च्या स्वातंत्र्य समरानंतर नगरमधूनही ब्रिटीशविरोधी लढा जोर धरू लागला.

> ब्रिटीश कालखंडातच १८५४मध्ये नगरला नगरपालिका स्थापन झाली. कर वसुली व स्वच्छता-पाणीपुरवठा-दिवाबत्ती सेवा सुविधांचे काम नगरपालिकेने सुरू केले. लोकनियुक्त मंडळे सत्तेवर येत गेली. १८८५मध्ये पहिले लोकनियुक्त अध्यक्ष खानबहादूर फ्रामजी आरदेसर निवडले गेले. शहराची नव्याने रचना, शहराच्या नऊ दरवाजांची (वेशींची) उभारणी, बाजारपेठेची निर्मिती अशी कामे लोकनियुक्त मंडळाच्या सदस्यांनी केली.

> महात्मा गांधीजींच्या 'चले जाव' आंदोलनावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, शंकरराव देव असे राष्ट्रीय नेते नगरच्या किल्ल्यात बंदिवान होते. नेहरूंनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ येथेच लिहिला. १५ ऑगस्ट १९४७ला नगरच्या भुईकोट किल्ल्यावरील फत्ते बुरुजावर आचार्य नरेंद्र देव यांच्या हस्ते तिरंगी ध्वज डौलाने फडकू लागला आणि नगरच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासकालिन संघर्षाची इतिश्री झाली.

> स्वातंत्र्यानंतरही नगरचा संघर्ष आजपर्यंत सुरू आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभा प्रतिनिधीच्या रुपाने नगरला नवे लोकांतून निवडले गेलेले सत्ताधीश लाभले. कमी-अधिक फरकाने यातील प्रत्येकाची कारकीर्द थोडीफार गाजली. डॉ. श्रीकृष्ण निसळ, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रा. एस. एम. आय. असीर, दादा कळमकर अशा काही आमदारांसह सर्वाधिक गाजलेली कारकीर्द ठरली ती नवनीतभाई बार्शीकरांची. शहराचे आमदार, नगरपालिकेचे लोकांमधून निवडून आलेले नगराध्यक्ष व नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष अशी तिहेरी भूमिका बजावताना त्यांनी नगरच्या विकासाला वेग दिला. शहराची पाणी योजना, बागबगिचे, जलतरण तलाव, एमआयडीसी अशा अनेक विकास योजना आजही त्यांचा शहरातील लौकिक टिकवून आहेत. त्यानंतर गेल्या २५ वर्षात शिवसेनेचे अनिल राठोड यांनी शहराची आमदारकी भूषविताना सामाजिक शांततेवर भर दिला.
=========

इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून ज्यांचा गौरव आणि उल्लेख केला जातो ते वा. सी. बेंद्रे यांचे दुर्मिळ झालेले साहित्य पुन्हा वाचकांना उपलब्ध झाले आहे. ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘शिवराज्याभिषेक प्रयोग’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराज’ अशी त्यांची पुस्तके ‘पाश्र्व’ पब्लिकेशनने पुनप्र्रकाशित केली आहेत.
महाराष्ट्राला इतिहास संशोधकांच्या परंपरेतील वा. सी. तथा वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक इतिहास ग्रंथसंपदा निर्माण केली. वयाच्या ८० व्या वर्षी ‘राजाराम महाराज चरित्र’ प्रकाशित करून कामावरील निष्ठा व्यक्त करणारे बेंद्रे हे वेगळेच विद्वान होते. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रेंचा मोठा वाटा आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांच्या या संशोधनातून प्रसिद्ध झालेली ग्रंथसंपदा गेली अनेक वर्षे दुर्मिळ झाली होती. अशा या ग्रंथमालेतील बेंद्रे यांनी लिहिलेले चार ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहेत. ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’,‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘शिवराज्याभिषेक प्रयोग’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराज’हे चार ग्रंथ पाश्र्व पब्लिकेशनने वाचकांना नव्याने उपलब्ध करून दिले आहेत.
बेंद्रे यांच्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ या ग्रंथाने समाजात विलक्षण खळबळ उडवून दिली. सुमारे ४० वर्षे त्यांनी या विषयाचा धांडोळा घेतला. परदेशातही शोध घेऊन संभाजी महाराजांची चुकीची रंगवली जाणारी प्रतिमा त्यांनी बदलवून टाकली. पराक्रमी, धोरणी, मुत्सद्दी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारा राजा ही खरी प्रतिमा समाजासमोर आणली. १९६० साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथाने अभ्यासकांना पुनर्अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. साहित्य अकादमीने या ग्रंथास पुरस्कृत केले. बेंद्रे शिवशाहीच्या अंतरंगात प्रवेश करीत खोलवर गेले. मालोजी, शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम यांच्या संबंधीच्या संशोधनाने त्यांचा आवाका दिसून आला.
चार ग्रंथांचे नव्याने प्रकाशन करण्यात आले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शिवकालीन इतिहास ज्ञात करून घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतील वाचकांसह अमेरिका, इंग्लड आदी विदेशातूनही ग्रंथांची खरेदी होत आहे. हा प्रतिसाद पाहून येत्या सहा महिन्यात ५ हजार प्रती विकण्याचा संकल्प प्रकाशकांनी केला आहे. विशेष म्हणजे चारही ग्रंथांची किंमत २५०० रूपये असली तरी पहिल्या महिन्यात खरेदी करणाऱ्यांना अवघ्या १३०० रूपयांमध्ये उपलब्ध केली असल्याचे प्रकाशक राहुल मेहता यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.



sambhaji by vishwas patil ebook
sambhaji by vishwas patil

sambhaji by vishwas patil

sambhaji by vishwas patil


sambhaji maharaj death history in marathi pdf

sambhaji maharaj death history in marathi language

sambhaji maharaj history in marathi language pdf download

sambhaji maharaj history in marathi mp3

sambhaji maharaj death video

sambhaji 1689

sambhaji maharaj in marathi information

sambhaji maharaj story in marathi

story of sambhaji raje

sambhaji maharaj death history in marathi pdf

sambhaji maharaj history in marathi mp3

sambhajimaharaj

sambhaji maharaj biography pdf

story of sambhaji raje

shambhuraje death

sambhaji maharaj history in marathi language pdf download

sambhaji maharaj history in marathi pdf free download

sambhaji maharaj

sambhaji by vishwas patil pdf download

sambhaji maharaj photo

sambhaji by vishwas patil pdf free download

sambhaji by vishwas patil ebook

sambhaji by vishwas patil marathi book download

books on sambhaji maharaj in marathi

sambhaji maharaj books in marathi pdf

No comments:

Post a Comment