Friday, September 30, 2016

Mohenjo Daro in marathi

Mohenjo Daro


'मोहेंजोदारो' mohenjo daro म्हणजे मृतांचे शहर. आजच्या पाकिस्तानातील सिंधचे रहिवासी या शहराला मृतांचे शहर म्हणतात. नुकताच या विषयावर चित्रपट येऊन गेला. अशा विषयावर सहसा एखादाच चित्रपट बनतो (एपिक फिल्म). चर्चेतला इतिहास विचारायचा आयोगाचा इतिहास असल्याने या विषयाची आज चर्चा करू.

पूर्वजांचे देणे
भारतीय इतिहास हा सलग आहे. अगदी सिंधू सभ्यताही त्या अर्थाने आपल्यामधून वाहते आहे. त्यांचा लगोरी हा आवडता खेळ, तंदुरी रोटी, मेंदी व ती लावायचा कोन, लिंगपूजा, योनीपूजा, पक्षपूजा, वृक्षपूजा, स्वस्तिक, सप्तमातृका, पशुपतीसारखा देव, एक्का हे वाहन, त्यांच्या लोककथा (कावळा व कावळ्याच्या तोंडातील मासा हवा असलेला कोल्हा), वळूचे महत्त्व, मोजमापाची पद्धती, व्यापारी कौशल्य हे सगळेच टिकून आहे.

मेलुहाचे चिरंजीव

मिथककथा या उलटसुलट झालेल्या आठवणीच असतात. 'मेलुहाचे चिरंजीव' या अमिश त्रिपाठी यांच्या पहिल्याच कादंबरीने खळबळ उडवली होती. सिंधू सभ्यतेला विषय करत ही कादंबरी नायक शिवाशी जोडते. सिंधूतील लोक स्वतःला काय म्हणत ते माहीत नाही, पण पश्चिम आशियातील लोक त्यांना 'मेलुहा' असे संबोधित. या कादंबरीतील शिवा हा एक व्यक्ती असतो जो पुढे परंपरेत देव म्हणून पूजला जातो. तो तिबेटमधून येतो. सरस्वती नदी आटल्यामुळे व आक्रमणांमुळे मेलुहाचे लोक त्रस्त असतात. शिवा (नीलकंठ) त्यांचा रक्षणकर्ता ठरतो.

चित्रपट की इतिहास

चित्रपट म्हणजे इतिहासावरील माहितीपट नव्हे. कथेला इतिहासाची पार्श्वभूमी वापरली जाते. पण इतिहासाचा तोल सांभाळून कथा उलगडून दाखवण्याचे आव्हान यात असते. 'बाहुबली' ही पूर्ण कल्पित कथा होती, तिथे हे आव्हान नव्हते. लगान, जोधा-अकबर दिग्दर्शित करणाऱ्या आशुतोष गोवारीकरकडून तर जास्तच अपेक्षा असतात. आशुतोषने मेलुहा कादंबरीचा आधार न घेता चित्रपटाने स्वतंत्र कथा निर्माण केली आहे. पण बाहुबली, मेलुहा व स्वतःचीच मोठी प्रतिमा यांच्या पलीकडे जाण्याचे आव्हान चित्रपटाला पेलवलेले नाही. भव्य पार्श्वभूमीवरील हा एक सामान्य चित्रपट आहे.

सिंधू की सरस्वती

चित्रपटात जास्त जोर लोकप्रिय सिंधू प्रतिमेवर दिला असला तरी जास्त शहरे ही सरस्वती नदीच्या काठावर आढळली आहेत. सरस्वतीला आज भारतात घग्गर व पाकिस्तानात हाक्रा असे म्हणतात. मूळच्या विशाल स्वरूपात ही नदी उपलब्ध नाही. पण तिचे अवशेष आहेत. जसे सांबर तलाव, पुष्कर तलाव किंवा भारतातील एकमेव अंतर्गत नदी (जी समुद्राला मिळत नाही) ती म्हणजे राजस्थानातील लुनी. सुरुवातीचे उत्खनन सिंधूवर झाल्याने सिंधू किंवा हडप्पा हे नाव प्रचलित झाले. नुकतेच मोहंजोदारोहून Mohenjo Daro मोठे शहर हरियाणा राज्यात सापडले आहे, ज्याला आज 'राखीगढी' Rakhigadhi असे म्हणतात.

प्राग इतिहास

चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात पूर्व इतिहास अशी माहिती दिली आहे. लेखनकला अवगत नसल्याने लिखित पुरावे सापडत नाहीत अशा काळाला पूर्व इतिहास म्हणतात. अगदी वैदिक संस्कृतीही पूर्व इतिहासात मोडते. कारण आर्य निरक्षर होते. पण सिंधू सभ्यतेतील लोकांकडे लिपी होती. फक्त ती आपल्याला अजून उलगडलेली नाही. अशा काळाला प्राग इतिहास म्हणतात. सिंधू प्राग इतिहास Sindhu Prag History आहे. ती लिपी उलगडली, तर सिंधू सभ्यताही इतिहासाचा भाग बनेल.

प्राथमिक साधनांवर अवलंबन

लिपी वाचन अजून न जमल्याने प्राथमिक साधनांवर (उत्खनन) आपल्याला भर द्यावा लागतो. व्दितीय साधने (साहित्य) उपलब्ध नाही. लिपी मर्यादित अक्षरांची आहे. ती प्रामुख्याने त्यांच्या मुद्रिकांवर आहे व त्या लिपीत मोठ्या लांबीची वर्णने मिळालेली नाहीत. कदाचित ही व्यापारी लोकांनी त्यांच्या व्यवहारांची नोंद ठेवण्याकरता निर्माण केलेली असावी.


 लिपीचे कोडे

 
सिंधू ही प्रामुख्याने नागरी संस्कृती असली तरी तिला विशाल असा ग्रामीण भाग होता हे विसरून चालणार नाही. किंबहुना चित्रपटाचा नायक शरमन 'आमरी' नावाच्या गावातून आलेला दाखवला आहे. आमरी या सिंधमधील गावात गेंड्याची हाडे मिळाली आहेत. त्यावरून त्याकाळी (इ. स. पूर्व २६०० ते २०००) घनदाट जंगल व चांगले पाऊसमान होते असा अंदाज बांधता येईल. लोक बहुदा 'ब्रुहेई' Bruhei Language नावाची भाषा बोलत असावेत, जी आज बलुचिस्तानात Baluchistan बोलली जाते. पण भाषा, लिपी व लोक यांची ताटातूट झाल्याने निश्चित सांगता येत नाही. ही लिपी लिहिताना डावीकडून उजवीकडे व नंतर पुढच्या ओळीत उजवीकडून डावीकडे असे नजर खंडीत न करता लिहीत.

व्यापारी यशाचे रहस्य

चित्रपटाचा नायक नीळ पिकवणारा शेतकरी दाखवला आहे. शहरात येऊन तो परदेशी व्यापारांशी सौदा करतो. नीळ पिकवण्यात पुढे १५व्या शतकापर्यंत भारताची मक्तेदारी होती. पुढे अगदी ब्रिटीश काळातही आपली भारतातील पहिली चळवळ गांधीजींनी निळीच्या शेतकऱ्यांसाठी केली होती. अफगाणिस्तानात सापडणारा इंद्रनीळ हा सुरेख दगड हीसुद्धा मक्तेदारी होती. सिंधूच्या व्यापाऱ्यांची जिद्द अशी की त्यांनी इंद्रनीळ मिळवण्यासाठी अफगाणिस्तानात शोर्तुघई येथे वसाहत स्थापन केली. कापसाचे पीक ही सिंधू सभ्यतेची जगाला देणगी आहे. त्यातही मक्तेदारी होती हे वेगळे सांगायला नको.

मुद्रिका
सिंधूमध्ये मुद्रिका (seals) सापडल्या आहेत. त्या मातीच्या बनल्या आहेत. सिंधूतील कलेची चांगली उदाहरणे त्यावर आहेत. विशेषतः मदार असलेला बैल Ox (वळू) डौलदार दिसतो. त्याचे अवयव, ताकद हे सर्व बारकाईने दाखवले आहे. अर्ध्याहून जास्त मुद्रिकांवर एकशिंग्या हा प्राणी दाखवला आहे. तो पुढून गेंड्यासारखा तर मागून घोड्यासारखा दिसतो. असा प्राणी आज तरी अस्तित्वात नाही. हा सिंधूतील लोकांच्या मिथकीय पवित्र प्राणी असावा. जसे पुढच्या काळात व्याल, गंडभीरूंड असे कल्पित प्राणी तयार केले जात.

प्राणी जीवन

गाई होत्या, पण त्यांचे महत्त्व कमी दिसते. कुत्रा पाळत, त्याला गळ्यात पट्टा घालून फिरायला नेत. पोपट-मैना पिंजऱ्यात पाळणे, त्यांना बोलायला शिकवणे हा आवडता छंद होता. भारताच्या गवती भागात पूर्वी घोडा असला (भीमबेटकाची चित्रे) तरी सिंधू संस्कृतीत घोड्याचे अवशेष आढळले नाहीत. त्यांचा देव ज्याला आपण आज पशुपती म्हणतो, हा प्राण्यांचा देव होता असे दिसते. त्याच्या डोक्यावर शिंगांचा मुकुट आहे. त्याच्याभोवती वाघ, हत्ती, पाण म्हैस व गेंडा दाखवला आहे. शिवाय हरिणही दाखवले आहे.

दहन की दफन?
चित्रपटात दहन दाखवले आहे व तेही नगरमध्ये. पण सभ्यतेत दीर्घकाळ दफन ही प्रथा होती, असे दिसते. खड्डा खणून मृताचे दफन करत. श्रीमंत लोकांचे खड्डे विटांनी बांधून काढत. त्याहून श्रीमंत लोकांच्या दफनसाठी पेटी (कॉफीन) वापरत. इतकेच काय लोथल येथे मृतांची ममी करून ठेवायचा प्रयत्न दिसतो. दफनसाठी नगराबाहेर वेगळी स्मशानभूमी हडप्पा येथे मिळाली आहे. पुढे दहन प्रथा चालू झाल्याचे पुरावेही दिसतात. मग काही भाग दहन करून उरलेला भाग दफन करणेही प्रचलित होते असे दिसते.

शस्त्रास्त्र व युद्धांचा अभाव

चित्रपटातील खलनायक अटीतटीने हडप्पाशी युद्ध करण्यासाठी शस्त्रे गोळा करताना दाखवला आहे. प्रत्यक्षात एकतर सिंधूच्या लोकांकडे लोखंडाचा अभाव होता. कांस्य हा प्रगत धातू त्यांच्याकडे होता. त्याचा वापर करून त्यांनी तयार केलेली उपकरणे सापडली आहेत, पण शस्त्रे सापडलेली नाहीत. दुसऱ्या कोणत्याही एवढ्या मोठ्या सभ्यतेत असे दिसून येत नाही. एकतर हे मोठे शांतताप्रिय लोक होते, किंवा मग ते एखाद्या धार्मिक-राजकीय दबावाखाली जगत होते, असा अंदाज बांधता येईल.

या संस्कृतीने भारतीय उपखंडात पहिल्यांदाच नागरीकरण निर्माण केले.


यूपीएससीच्या २०१४च्या मुख्य परीक्षेत पहिलाच प्रश्न सिंधू संस्कृतीच्या नागरी वैशिष्ट्यांवर विचारला होता. आजच्या नागरीकरणासाठी सिंधू संस्कृचीच्या नागरी नियोजन आणि संस्कृतीची कितपत मदत घेता येईल?

नागरीकरणाची सद्यस्थिती

शहरे ही विकासाची इंजिन असतात. भारताचा ६३% जीडीपी शहरांतून येतो. सध्या भारतामधील ३१% लोकसंख्या नागरी आहे. १९०१ साली फक्त ११% लोकसंख्या नागरी होती. याचा अर्थ गेल्या एका शतकात नागरीकरण दुपटीपेक्षा जास्त झाले आहे. सध्या १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ५३ शहरे भारतात आहेत. ज्या प्रकारे चीनचे वेगाने नागरीकरण होत आहे, त्याहून जास्त वेगाने भारताचे नागरीकरण होण्याची शक्यता आहे. सध्या दरवर्षी एक कोटी लोक ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरीत होतात. सर्वात जास्त नागरी लोकसंख्या महाराष्ट्रात राहते व सिंधू संस्कृतीचे दक्षिण टोक महाराष्ट्रात होते.

नियोजित नागरीकरणाची गरज

नागरीकरण वाढते आहे. पण त्यातून आधीच नसलेल्या नियोजनाचा बोजवारा उडतो आहे. अनियोजित शहरात लोक कुठेही वस्ती करतात. झोपडपट्ट्यांमध्ये वाढ होते. रस्ते अरुंद असतात व त्यामुळे वाहतूक मंदावलेली असते. जागेची तीव्र टंचाई असल्याने राहणीमान खालावते. प्रदूषण, मोकळ्या जागेचा अभाव, वाहती गटारे व त्यातून येणारे साथीचे रोग यांचा सामना लोकांना करावा लागतो. खर्च वाढतात व फायदे कमी होतात. अशा स्थितीत भारताचे पहिले नागरीकरण असलेल्या सिंधू संस्कृतीकडून खूप काही शिकून घेता येईल.

सिंधू संस्कृतीतील नागरीकरण

सापडलेल्या बहुसंख्य स्थळांवर नियोजित नागरीकरणाचे पुरावे दिसून येतात. शहराचे वेगवेगळे भाग केले जात. राज्यकर्ता वर्ग शहराच्या वरच्या भागात राहत असे. गढीसारखी त्याची संरचना असे. प्रत्येक भागाला व पूर्ण शहराला दगडांची तटबंदी असे. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत. (ग्रीड पॅटर्न) त्यामुळे नगराच्या कुठल्याही भागात लवकर पोहोचता येई. रस्त्यावर फुटपाथ होते. फुटपाथवर झोपडपट्ट्या किंवा फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसत नाही. रस्ता जिथे वळतो, तिथे घरांच्या भिंतींचे कोन घासून गोल करून ठेवत. म्हणजे कोणी त्यावर आदळले, तरी इजा होऊ नये. गटारे रस्त्याच्या मध्यभागी असत. ती फरशांनी झाकलेली असत.

नागरी लोकसंख्या Population of Mohenjo Daro

आजच्या मानाने नगरांची लोकसंख्या कमी वाटली, (सुमारे ४०,००० लोक) तरी त्या काळाच्या मानाने ही मोठी शहरे होती. हडप्पात रस्त्यावर तेलाचे दिवेही लावत. तो नागरीकरणाचा उच्चबिंदू म्हणता येईल. याचा अर्थ लोक रात्रीही सक्रिय होते. धुळीच्या वादळापासून वाचण्यासाठी घरांच्या दारे व खिडक्या गल्लीच्या आत असत. वाद टाळण्यासाठी असेल, पण दोन घरांना सामाईक भिंती नसत.

पाणी व्यवस्थापन Water Management

प्रत्येक घरात एक खोली विहिरीची असे. त्यातून रोज लागणारे पाणी शेंदून घेत. नद्यांच्या काठी नगरे असल्याने विहिरीला पाणी मुबलक असे. घरातच संडास, बाथरूम होते. कमोड प्रकारचे संडासही सापडले आहेत. पाणी टाकून फ्लश करायची सोय होती. बाथरूममध्ये शॉवरची सोय असे. त्यातही गरम पाण्याचा व थंड पाण्याचा असे वेगळे शॉवर असत. लोक आंघोळ उभे राहून करत. बाथरूम रस्त्याला लागून असे, ज्यामुळे गटारात वापरलेले पाणी सोडणे सोपे जाई. गटारव्यवस्था उत्कृष्ट होती. सांडपाणी साठून राहणार नाही, तुंबणार नाही याची काळजी घेतली जाई. त्यातून स्वच्छतेवर भर दिसतो.

 जल है, तो कल है!
गुजरातमधील धोलावीरा येथील नगरात पाणी साठवणुकीचे तलाव मिळाले आहेत. त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय होती. तलावांची एक साखळीच होती. एक तलाव भरला की दुसऱ्यात पाणी जाई. असे शहराला सात वेढे देत पाणी आत घेतले जाई. त्यामुळे पाणी अडवा, पाणी फिरवा, पाणी जिरवा या सर्व पद्धतींचा परिणामकारक वापर केलेला दिसून येतो. ग्रामीण भागात पाझर तलाव व छोटे बंधारे असत. लोखंड नसतानाही फक्त नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत शेती करून पीक काढणे ही हडप्पा सभ्यतेची खासियत म्हणता येईल. दुसरीकडे पुढे दक्षिणेतल्या महापाषाण संस्कृतीकडे लोखंड होते, पण त्यांची शेती मागास होती. त्यातून असे दिसते की, फक्त धातूची उपलब्धी निर्णायक नसते.

विटांचा वापर
शेजारच्या सुमेर सभ्यतेत सूर्यप्रकाशाने भाजलेल्या वीटा वापरात असताना भट्टीत भाजलेल्या वीटा वापरणे हे सिंधू सभ्यतेचे वैशिष्ट्य ठरले. या वीटांचा आकार ४:२:१ असा प्रमाणित होता. ज्यामुळे वास्तूनिर्मिती करणे सोपे जाई. वीटभट्टी लावणे हे मोठे कौशल्याचे काम असते. वीटा सर्व बाजूने व मधून पुरेशा भाजल्या गेल्या पाहिजेत व कुठेही कच्च्या राहता कामा नये याची काळजी घ्यावी लागे. सगळीकडे एकाच आकाराच्या वीटा असल्याने केंद्रित उत्पादन व वितरणाची काहीतरी सोय असावी असे वाटते. या वीटा इतक्या चांगल्या दर्जाच्या आहेत की, आजही वापरात आणता येतील. किंबहुना सिंधू सभ्यतेचा शोधच वीटांमुळे लागला होता. (रेल्वे कामगारांनी वीटांची घरे बनवल्यावर अधिकाऱ्यांना त्यांनी अफरातफर केल्याचा संशय आला, त्या प्रकरणाच्या चौकशीतून
सभ्यतेचा शोध लागला.)


सभ्यता व पर्यावरण
सभ्यता विकसित होत जाते व त्याचबरोबर तिचा पर्यावरणावरील आघात वाढत जातो. मानव आपल्या सोयीसाठी निसर्गाला वेठीस धरतो. सिंधूमधील लोकांना वीटांच्या वास्तूंची विशेष आवड होती असे दिसते. इतकेच काय तर गुजरातमध्ये खंबायतच्या आखातात वसलेली लोथल येथील कृत्रिम गोदीदेखील वीटांचीच आहे. मोहेंजोदारोमध्ये १० लाख वीटा वापरल्या असाव्यात असा अंदाज आहे. इतक्या वीटा भाजायच्या तर निदान ४०० एकर जंगल जाळले पाहिजे.

व्यापारी वृत्ती
लोक व्यापारी वृत्तीचे होते. कलेची आवड त्यांनी जोपासली, पण ती कांस्य नर्तिकेसारख्या छोट्या मूर्ती बनवून. श्रीमंती असूनही त्यांनी ताजमहालसारखे एखादे स्मारक तयार केलेले दिसत नाही. इंद्रनीळ या मण्याला परदेशात मोठी मागणी असल्याने त्याची निर्यात करत, पण स्वतः वापरत नसत. सिंधू सभ्यतेच्या क्षेत्रात राहणारे लोक उदा. पंजाबी, मारवाडी, मुलतानी, गुजराती हे आजही त्यांच्या व्यापारी कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. नाणी नसताना हे लोक व्यापार कसा करत हे एक कोडेच आहे. कारण त्यांच्या मुद्रिका मातीच्या होत्या व त्या ओळखपत्रासारख्या वापरल्या जात. काहींनी ते वस्तूविनिमय करत असावेत, असे सुचविले आहे. पण एवढी मोठी व्यापारी संस्कृती फक्त वस्तूविनिमयावर उभी करणे शक्य नाही. कदाचित भविष्यात नाणी सापडतील. कारण सध्या अंदाजे ३% क्षेत्राचेच उत्खनन झाले आहे.

mohenjo daro in marathi

mohenjo daro in hindi

mohenjo daro history

No comments:

Post a Comment