Saturday, November 8, 2014

Marathi Katha

शुकबहात्तरीमध्ये एक कथा आहे . शालिपुरातील गुणाकार नावाच्या तरुण व्यापाऱ्याची पत्नी श्रियादेवी दुसऱ्या एका तरुण व्यापाऱ्यावर अनुरूक्त होती . एकदा ती परपुरुषाच्या शय्येवर असताना तिच्या सासऱ्याने व्यभिचाराचा पुरावा म्हणून तिच्या पायातील नुपूर काढून घेतले . हे तिच्या ध्यानी येताच तिने त्या परपुरुषाला पाठवून दिले आणि पतीच्या शय्येवर येऊन त्याला जागे करून सासऱ्याविरुद्ध तक्रार केली .

सासऱ्याने तिच्यावर पुराव्यासह आरोप करताच ती स्त्री म्हणाली , ' मी तुमच्या पुत्राच्या शय्येवरच शयन केले होते , हे सिद्ध करण्यासाठी मी एक दिव्य करते .' त्या गावाच्या उत्तरेला एक वेताळाचा माळ होता . तेथे वेताळाची भव्य मूर्ती होती . जो खरा असतो तोच त्या वेताळाच्या ढांगांखालून पलीकडे जाऊ शकतो , हे सर्वांना माही त असते . ती स्त्री म्हणाली , ' मी त्या वेताळाच्या ढांगेखालून पलीकडे जाईन .'

दिव्य करण्याचे निश्चित होताच त्या व्यभिचारणीने आपल्या प्रियकराला निरोप पाठविला की , ' तू दिव्य करण्याच्या ठिकाणी वेड्याच्या वेशात ये . मी वेताळाच्या मूर्तीकडे जाऊ लागताच माझ्या गळ्याला मिठी मार .' वेताळाच्या माळावर सर्व गावकरी जमतात . ती स्त्री दिव्य करण्यासाठी शेजारच्या सरोवरात स्नान करते आणि हातात पूजासाहित्य घेऊन दिव्य करण्यासाठी जाऊ लागते . ठरल्याप्रमाणे वेड्याच्या आवतारातील तिचा प्रियकर हातवारे करीत येतो आणि तिला मिठी मारून पळून जातो .

 ती स्त्री लोकांना उद्देशून म्हणते , ' त्या वेड्याच्या स्पर्शाने माझी काया अपवित्र झाली आहे . मी पुन्हा सरोवरात स्नान करते .' स्नान झाल्यावर ती स्त्री वेताळाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी राहते आणि सर्व गावकऱ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात बोलते . ' हे वेताळा , माझा पती आणि माझ्या गळ्यात पडलेला वेडा या दोघांशिवाय कोणाही दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला चुकूनही झालेला असेल , तर मला तुझ्या ढांगांखालून जाऊ देऊ नकोस .' असे म्हणून ती वेताळाच्या ढांगांखालून सहजपणे पलीकडे जाते . ते पाहून गावातील सर्व लोकांनी तिचा ' सती ' म्हणून गौरव केला आणि सासऱ्याला दोषी ठरविले . वेताळ तिच्या चातुर्यापुढे थक्क झाला .

आपणही तिच्या बुद्धिचातुर्यावर खुश होतो . एखाद्या सज्जन माणसाने बुद्धिचार्तुयाने आपले निरपराधित्व सिद्ध केले तर आनंद होणे स्वाभाविक आहे . पण चोर , फसवे , ‌ नीतिभ्रष्ट , दुष्ट , पापी लोक बुद्धीचा वापर करून कायद्याच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घेतात आणि उजळ माथ्याने समाजात वावरू लागतात तेव्हा संभ्रम निर्माण होतो . असा संभ्रम निर्माण होईल अशीच परिस्थिती आज आहे . अनेक लोक निर्दोष सुटणाऱ्या गुन्हेगाराच्या मागे जाताना , त्याचा उदोउदो करताना दिसतात . खरेतर एखाद्याच्या बुद्धिचातुर्यामुळे चकित न होता आपण सत्याच्या बाजूला उभे राहायला हवे , नाहीतर संत तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवले आहे ,

आंधळ्याचे काठी लागले आंधळे। घात एक वेळे मागेपुढे।

No comments:

Post a Comment