Sunday, November 23, 2014

350 years of Sindhudurg Killa


 350 years of Sindhudurg Killa(Sea fort)
sindhudurg killa photos


अप्रतिम दुर्गबांधणी व अष्टावधानाचे प्रतीक असलेल्या सिंधुदुर्गाच्या उभारणीला उद्या २४ नोव्हेंबरला तब्बल ३५० वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शिवछत्रपतींनी मालवण किनाऱ्याजवळ उभारलेल्या या अभेद्य-अजस्र जलदुर्गाची सांगितलेली इतिहासगाथा.

जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे राज्य ताब्यात घेऊन व अफझलखानाला मारून शिवाजीमहाराज ससैन्य कोकणात उतरले व त्यांनी स्वराजाची हद्द समुद्राला भिडविली. आदिलशहाची ठाणी काबीज घेऊन महाराज मालवण किनाऱ्यावर आले, त्यावेळी कोकणाची स्थिती अत्यंत भयानक होती. आदिलशहा, सिद्दी व पोर्तुगीजांचे अत्याचार, जबरदस्तीने होणारी धर्मांतरे, फुटणारी देवळे, कोकणातील स्त्री-पुरुषांना पकडून परदेशात गुलाम म्हणून होणारी रवानगी हा कोकणाकिनाऱ्यावरील नेहमीचा प्रकार होता. प्रजेला पुत्रासमान मानणाऱ्या महाराजांना नियतीने दिलेले हे जणू आव्हान होते. या कठीण आव्हानाला महाराजांनी दिलेले अत्यंत अचूक व परिणामकारक उत्तर म्हणजे, त्यांनी सुरू केलेली जलदुर्गांची उभारणी.

उन्मत्त इंग्रज, अरबी चाचे, डच, आदिलशहा, सिद्दी व पोर्तुगीज अशा स्वराज्याच्या शत्रूंपासून कोकणाकिनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठी कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग या हस्तगत केलेल्या किल्ल्यांपेक्षाही एका अभेद्य बलवान जलदुर्गाची उणीव महाराजांना भासत होती. कोकणाकिनारपट्टी न्याहाळताना मालवणचे कुरटे बेट महाराजांच्या नजरेस पडले व ते उद्गारले- 'चौऱ्याऐंशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही. शुध्द खडक स्थळ उत्तम.' आणि याच जागी बुलंद जलदुर्ग बांधण्याचं ठरलं.

त्याकाळी आदिलशहाच्या अरबी चाचांच्या दहशतीमुळे मालवणमधील कोणीच किल्ल्याच्या गणेशपूजनास यायला धजावत नव्हतं. महाराजांचं फर्मान सुटलं आणि अरबी चाचांच्या गढी जमीनदोस्त करीत कोकणाकिनारपट्टीतील आदिलशहाचं नामोनिशान मराठ्यांनी मिटवून टाकलं. कोस दोन कोसांवर महाराजांचे पहारे व चौक्या बसल्या आणि अख्खी कोकणपट्टी आदिलशहाच्या दहशतीतून मुक्त झाली. शुक्रवार २४ नोव्हेंबर १६७४च्या पहाटे मालवणच्या दांडी किनाऱ्यावरील 'मोर्याचा धोंडा' या खडकावर गणेश, शिवलिंग, सूर्य-चंद्र आणि नंदीची शिल्पं कोरून गणेशपूजनाचा ऐतिहासिक क्षण मोठ्या दिमाखात पार पडला. या बांधकामासाठी त्याकाळी एक कोटी होन एवढा प्रचंड खर्च येणार होता. त्याच्या तरतुदीसाठी परिणामांची वा बदनामीचा विचार न करता महाराजांनी अख्खी सुरत लुटली. त्या लुटीतून शिल्पकार हिरोजी इंदूलकर यांच्या देखरेखीखाली स्वराज्याची शिवलंका आकार घेऊ लागली. स्वत: महाराज या बांधकामात जातीने लक्ष घालत होते.

बांधकाम चालू असतानाच घात झाला. पातशहा औरंगजेबाने महाराजांना शंभुराजांसह आग्र्यात कैद केलं. परंतु किल्ल्याचं बांधकाम चालूच राहिलं. तीन किलोमीटर लांबीची ५२ बुरुजांची सर्पाकार तटबंदी सिंधुसागरात उभी राहिली. बांधकाम पूर्ण झाल्यावर किल्ल्यावर गोड पाण्याच्या ३ विहिरी मिळाल्या आणि त्याचदरम्यान महाराजांनी शिताफीने आग्र्याहून सुटका करुन घेतली. महाराज रायगडावर परत आले आणि समस्त कोकणाकिनारपट्टीने एकच जल्लोष केला. हिंदुस्थानच्या आरमाराचा जनक स्वगृही परतला होता.

रायगडावर परतल्यानंतर, स्वराज्याची घडी बसवल्यावर महाराज आपल्या लाडक्या किल्ल्याला पाहण्यासाठी मालवणला आले. किल्ल्याचं दर्शन घेतल्यावर हा अभेद्य/अजस्र जलदुर्ग पाहून शिल्पकार हिरोजी इंदूलकर यांच्या कारागिरीवर अतीव संतोष पावले. या जलदुर्गाचे नामकरण त्यांनी 'सिंधुसागरावर दरारा करणारा दुर्ग- सिंधुदुर्ग' असं केलं. महाराजांचं आरमार सिंधुदुर्गच्या कवेत निर्धास्त होतं. कोकणाची जनता व व्यापारी आता सुखावले होते. आता सिंधुसागरही स्वराज्याशी सलगी ठेवू लागला. आदिलशहा महाराजांना कुर्निसात करू लागला, पोर्तुगीजांच्या मस्तीला व डचांच्या मुजोरीला चाप बसला. उन्मत्त सिध्दीला घाम फुटला, अरबी चाचांनी सिंधुसागरातून पळ काढला, गोरा फिरंगी शंभर वाव लांबून चालत होता. महाराजांचा डंका व दरारा पार युरोपात पोहचला. जगातील सर्वोत्कृष्ट आरमार म्हणजे मराठ्यांचं आरमार, यावर जागतिक शिक्कामोर्तब झालं.

ही केवळ सिंधुदुर्ग किल्याची निर्मिती नव्हती, तर समाजव्यवस्था बदलण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. त्याकाळी हिंदूनी समुद्रपर्यटन करु नये, ही अंधश्रध्दा प्रचलित होती. बुरसटलेल्या हिंदू संस्कृतीतील सिंधुबंदी झुगारुन शिवछत्रपतींनी मालवण बंदरातून समुद्रलंघन करीत बसरूरवरील आरमारी मोहीम फतेह केली. शालिवाहनानंतर ७०० वर्षांनी हिंदवी साम्राज्याच्या मराठा आरमाराने सिंधुसागरावर दरारा निर्माण केला. हिंदू धर्मातील अंधश्रध्दा मालवणच्या समुद्रात बुडवून महाराजांनी हिंदू धर्माला समाजप्रबोधनाची दिशा दाखविली.

संपूर्ण मुस्लीम समाज हा राष्ट्रदोही आहे, हा या समाजावर लागलेला कलंक पुसत मराठा आरमाराच्या उभारणीत शिवछत्रपतींनी शमाद खान, सुल्तान खान, दर्या सारंग, दाऊत खान अशा कर्तबगार मुस्लिमांना महत्वाची पदं दिली. आरमारप्रमुख म्हणून दौलतखान यांची नेमणूक केली. केरळपासून उत्तर प्रदेशापर्यंत मुस्लीम तरूण जिहादी/देशद्रोही कारवायांत गुंतले असताना कोकणातील मुस्लीम तरुणांनी शिवाजीमहाराजांचा विश्वास सार्थ ठरवत दहशातवाद व राष्ट्रद्रोही कारवायांना कोकणात थारा दिला नाही. कोकणी मुस्लिमांच्या देशभक्तीबद्दल कोणीच शंका घेतलेली नाही. आजही किल्यावर शिवाजीमहाराजांनी वतन दिलेली मुस्लीम कुटुंबं गुण्यागोविंदाने राहतात.

आज देशभर दलितांवर अत्याचार होत असताना कोकणकिनारपट्टी मात्र अशा घटनांपासून अलिप्त आहे. शिवाजीमहाराजांच्या काळापासून कोकणात कोठेही जातिभेदाला थारा नाही. शिवरायांनी सिंधुदुर्गाच्या गढीच्या रक्षणाची जबाबदारी दलितांकडे दिलेली होती. शिवरायांनी दलितांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. याचप्रमाणे त्यांनी कधी परधर्मीयांनाही नाडलं नाही, वेंगुर्ल्याच्या डचांची वखार लुटताना शिवछत्रपतींनी तेथील चर्चेसला हात लावू दिला नाही. भारतातील सर्वात जुनं चर्च वेंगुर्ल्याला असून ते शिवाजीराजेंच्या सर्वधर्मसमाभावाचं प्रतीक आहे. त्यामुळेच २५ वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्याचा राखणदार श्रीदांडेश्वराच्या मंदिर उभारणीच्यावेळी जॉर्ज डिसूझा या स्थानिक ख्रिश्चन जमीनदाराने आपली सोन्याच्या भावाची जमीन देवस्थानाला दिली, एवढंच नव्हे तर देवळाच्या आड येणारी नारळाची झाडं काढून टाकली.

शिवाजीमहाराजांचा पराक्रम व कर्तृत्वाची गाथा जगाला सांगण्यासाठी अरबी समुद्रात हजारो कोटींचं शिवस्मारक उभारलं जाणार आहे. परंतु शिवछत्रपतींची शौर्यगाथा या शिवस्मारकात साऊंड-लेझर शोद्वारा दाखविण्याऐवजी कोकणकिनारपट्टीवर पर्यटकबोटसेवा सुरू करून जलदुर्गांची सफर घडविल्यास या किल्ल्यावरील प्रत्येक बुरुज मर्द मावळे/रजपूत/भंडारी/गाबितांची आरमारी शौर्यगाथा सांगेल. शिवस्मारकावर उधळपट्टी करण्याऐवजी किल्ल्यांची ढासळलेली तटबंदी पुन्हा बांधली, तर शिवरायांनी घडवलेला इतिहास पुन्हा एकदा उजळून निघेल. 

Sindhudurg Killa

sindhudurg killa information

sindhudurg killa photos

sindhudurg fort

sindhudurg fort photo

sindhudurg fort photo gallery

No comments:

Post a Comment